राळेगणसिद्धी दि.२३ ( प्रमोद दळवी ) : स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी या सेवाभावी संस्थेकडून दिला जाणारा “अण्णासाहेब हजारे सामाजिक सेवा गौरव सन २०२५-२६ च्या वर्षीचे पुरस्कार महाराष्ट्रातील पाच जणांना घोषित करण्यात आला आहे. संस्थेच्या निवड समिती मार्फत दिनांक २३ मार्च २०२६ या शहिद दिनी जाहीर करण्यात आले. प्रत्यक्ष वितरण कार्यक्रम दि.१५ जून २०२६ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत समारंभ पूर्वक, मानपत्र, सन्मानचिन्ह व पुरस्काराची रक्कम प्रदान केली जाणार असल्याची माहिती समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली.

पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेल्यांची नावे अशी आहेत १)मा. श्री यजुर्वेंद्र महाजन- दिपस्तंभ फाऊंडेशन (मनोबल), जि. जळगाव रुपये २,००,०००/- २) मा. श्री दिपक नागरगोजे, शांतीवन प्रकल्प, आर्वी, ता. शिरूर कासार, जि. बीड. रुपये१,५०,०००/-,३)मा.श्री. शिवाजीराव डोळे, (माजी सैनिक) व्यंकटेश्वरा को- ऑपरेटिव्ह पॉवर अँड अग्रो प्रोसेसिंग लि. अंजग-वडेल ता. मालेगाव, जि. नाशिक. रुपये १,००,०००/-, ४)मा. श्री अनंत झेंडे- महामानव बाबा आमटे सेवा संस्था, चिखली, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर. रुपये १,००,०००/-, ५)मा. श्री डॉ नंदू पालवे- सेवा संकल्प प्रतिष्ठान, बेलखेड ता. चिखली, जि. बुलढाणा. रुपय १,००,०००/-.व त्यांना, मानपत्र, सन्मानचिन्ह व पुरस्काराची रक्कम दिली जाणार आहे.
या बाबत समाजसेवक अण्णा हजारे यांनी माहिती देत सांगितले कि मला जीवनात स्वामी विवेकानंदांच्या पुस्तकातून मानवी जीवनाचा अर्थ कळत गेला. मानव सेवा हीच इश्वर सेवा हे समजल्याने आपल्या जीवनातही जे काही कर्म करावयाचे ते निष्काम भावनेने, कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता समाजातील दिन-दुबळे, रंजले-गांजलेले व उपेक्षित जीवन जगणाऱ्यांसाठी कार्य करायचे असा ठाम निर्णय वयाच्या १७ व्या वर्षी भर तारूण्यात घेतला. तथापि हे कार्य उपाशी पोटी हे कसे करणार? व स्वतःचा भार इतरांवर पडू नये या करिता सैन्य दलात जाण्याचा निर्णय घेतला. १९६२ साली झालेल्या चीन युद्धात सैनिकांची जीवीत हानी मोठ्या प्रमाणावर झाल्याने भारतीय सैन्य दलात १९६३ साली दाखल झालो. पुढे देश सेवा करीत असताना सन १९६५ मधील पाकिस्तानच्या आक्रमणात माझ्या बरोबरीने काम करणारे अनेक जवान शहीद झाले. सुदैवाने मी वाचलो गेलो ही इश्वराची कृपा, व पुनर्जन्म समजून पेन्शन मिळेपर्यंत देश सेवा केली. दरम्यान महात्मा गांधीजींची पुस्तके वाचत गेलो व कामाला सुरवात केली. जन्मभर अविवाहीत राहूनच हे कार्य करता येईल म्हणून आजन्म ब्रम्हचारी व्रताचे पालन केले. मंदीरात वास्तव्यास राहिलो. देश बदलायचा असेल तर देशाचा घटक गाव, गावाचा घटक कुटूंब व कुटूंबाचा घटक प्रत्येक व्यक्ती बदलल्याशिवाय देशाचा विकास साध्य होणार नाही. या भावनेने समविचारी सहकाऱ्यांचे संघटन बांधणी करून स्वतःच्या गावातून कार्याला सुरूवात केली. गावात कार्य करताना श्रमदान, नशाबंदी, कुऱ्हाडबंदी, चराईबंदी, नसबंदी या पंचसुत्रीचा अवलंब केला. प्रसंगी राज्यात व देशातील समाजाच्या ज्वलंत प्रश्नांवर अनेक वेळा उपोषणे आणि आंदोलने करावी लागली. त्यातून देशातील जनतेला १) माहितीचा अधिकार, २)शासकीय बदल्यांचा कायदा, ३) ग्रामसभेला जादा अधिकार कायदा ४) दप्तर दिरंगाईचा कायदा ५) नागरिकांची सनद ६)जनलोकपाल कायदा ७)ग्रामरक्षक दल ८) महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक यांसारखे कायदे मिळाले. गावातील प्रत्येक समस्येवर विचार विनिमय करून त्यावर मार्ग व उपाय शोधण्यात आले. उदा. जलसंधारण, शिक्षण, पर्यावरण, पशुसंवर्धन इ. बाबींवर कार्य करण्यात आले. त्याचा लाभ गावकऱ्यांना मिळत गेला व या सर्व कार्यांचा प्रचार व प्रसार वाढत जाऊन तालुका, जिल्हा, राज्य, देश, आणि विदेशातही होत गेला.वरील कार्याची नोंद घेऊन समाजातील वेगवेगल्या स्तरातील भेटी देणारे लोक, तसेच वेगवेगळ्या संस्था, शासन, देश व परदेशातूनही पुरस्कार मिळत गेले.
समाजाकडून मिळालेली ही रक्कम समाजालाच परत करायची यासाठी सन १९९८ मध्ये स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी या संस्थेची स्थापना करून समाजामध्ये निष्काम भावनेने कार्य करणाऱ्या व्यक्ती तथा संस्था यांना प्रेरणा मिळावी म्हणून वरील संस्थेच्या माध्यमातून प्रती वर्षी हे पुरस्कार दिले जात आहेत. मिळालेल्या पुरस्कारांची एकूण रक्कम १,६७,०००००/- (एक कोटी सदुसष्ट लक्ष रू.) बँकेत कायम स्वरूपी ठेवी ठेवून त्यावर मिळणाऱ्या व्याजातून प्रती वर्षी पुरस्कार प्रदान केले जात आहेत. असे कि. बा. तथा अण्णा हजारे यांनी सांगितले .





























