- व्यवस्थित नियोजन केले तर विद्यार्थ्यांच्या पाठीवरील पुस्तकाचे ओझे वाढणार नाही – शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे
उल्हासनगर दि. २० ( प्रमोद दळवी ) : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याच्या उद्देशाने इयत्ता २ री ते इयत्ता ८ वी च्या पाठ्यपुस्तकांबाबत शासनाने ८ मार्च २०२३ रोजी जो आदेश काढला होता. तो आदेश आता पुन्हा नव्याने निर्णय घेत काढल्याने विद्यार्थ्यांना आता पूर्वीप्रमाणेच पुस्तकाचा ओझं पाठीवर घ्यावे लागणार आहे. विद्यार्थी पालक व शिक्षक या सर्वांकडून शासनाने सर्वे करून घेतल्यावर हा नवा निर्णय घेण्यात आले असल्याची माहिती शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दिली आहे.तसचे व्यवस्थित नियोजन केले तर विद्यार्थ्यांच्या पाठीवरील पुस्तकाचे ओझे वाढणार नाही असे मत शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी व्यक्त केले .

शिक्षण व शिक्षणाचे साहित्य त्यांचे सार्वत्रिकरण होणे, प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे, पाठ्यपुस्तके व वह्या यांच्या वजनाने दप्तराचे ओझे वाढले जाणे, दप्तराच्या वाढत्या वजनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा विपरित परिणाम व सोबतच राज्यातील खेडोपाडी असणाऱ्या गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना शाळेत शिकायला जाताना पुरेसे लेखन साहित्य उपलब्ध नसणे, या सर्व मुद्यांचा विचार करून शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून इयत्ता २ री ते इयत्ता ८ वी च्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने समाविष्ट करण्याबाबतचा शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण-२०२२/प्र.क्र.११६/एसडी-४, दिनांक ०८ मार्च, २०२३ रोजी घेण्यात आला होता. या शासन निर्णयातील अनु. क्र. ८ मध्ये प्रस्तुत योजनेची यशस्वीता लक्षात घेऊन शालेय वर्ष २०२४-२५ पासून सदर योजना पुढे सुरु ठेवावी, असे नमूद करण्यात आले होते.

संचालक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यास संशोधन मंडळ, बालभारती, पुणे यांचे पत्र क्र. ह/भापा-भापेतर/६०६०, दिनांक १८.१२.२०२४ रोजी पत्रान्वये शासनाच्या असे निदर्शनास आणले आहे की, सदर योजना प्रायोगिक तत्वावर असल्याने तसेच पुनश्च याबाबत वेळोवेळी आढावा घेऊन, ही योजना पुढे सुरु ठेवण्याबाबत मूळ धोरणात विचार असल्याने सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात वह्याची पाने समाविष्ट करुन पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. तथापि सदर योजनेचा आढावा घेतला असता, पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या वह्यांच्या कोऱ्या पानांचा विद्यार्थ्यांकडून शिकविलेल्या घटकांच्या नोंदी घेण्यासाठी अपेक्षेप्रमाणे उपयोग झाल्याचे दिसून आले नाही. तसेच सदर योजनेचा उद्देश हा दप्तराचे ओझे कमी करणे असा होता, परंतु विद्यार्थी पुस्तके व सोबत वह्या देखील घेऊन येत असल्याचे तसेच पाठ्यपुस्तकांमधील कोऱ्या पानांचा शैक्षणिक नोंदी घेण्याकरिता वापर होत नसल्याचे आढळून आले. त्यामुळे सदर योजनेचा अपेक्षित उद्देश फारशा प्रमाणात सफल झाल्याचे दिसून आले नाही.त्यामुळे शासन निर्णयः संकीर्ण-२०२२/प्र.क्र.२१६/एसडी-४ उपरोक्त वस्तुस्थिती विचारात घेऊन, संदर्भ क्र. १ येथील दिनांक ०८ मार्च, २०२३ रोजीचा शासन निर्णय अधिक्रमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यास अनुसरुन शासनाने दिनांक ०८ मार्च, २०२३ रोजीचा शासन निर्णय अधिक्रमित करण्यात आला आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ व त्यापुढे पूर्वीप्रमाणेच नियमित पाठ्यपुस्तके वह्यांच्या पानांशिवाय उपलब्ध करून देण्यात यावीत असा निर्णय घेण्यात आला आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संकेतांक २०२५०१२८१६०१०२४०२१ असा आहे.

याबाबत शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सांगितले ८ मार्च २०२३ रोजी शासनाने विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन कमी करावं या उद्देशाने जो शासन आदेश काढला होता. त्या शासन आदेशामध्ये एकच पुस्तक सर्व विषयाला ठेवलं होतं आणि त्याचबरोबर काही वहीची पानं त्याच्यामध्ये ऍड केली होती. तेव्हा शिक्षकांना शिकवण्यामध्ये अडचण आली. की पहिली युनिट टेस्ट जर झाली तर त्याचा अभ्यासक्रम हा पुढे आपल्या सहामाही परीक्षा पर्यंत असतो. आणि सहामाही परीक्षेचा अभ्यासक्रम दुसऱ्या पुस्तकामध्ये असतो जर शिक्षकाला जेव्हा मागे येऊन काही रेफरन्स शिकवायचं असतं मागचा संदर्भ देऊन मागच्या धड्याचा संदर्भ देऊन काही शिकवायचं असतं त्या वेळेला तो अभ्यासक्रम किंवा ते पुस्तक त्यांना अवेलेबल होत नव्हतं. मग पुन्हा ते पुस्तक विद्यार्थ्यांना परत आणावं लागत होतं. त्या पुस्तकाची जाडी आणि पुन्हा त्याच्याबरोबरच दुसरं पुस्तक याच्यामध्ये कुठेतरी ताळमेळ जुळत नव्हता. तर विद्यार्थी असतील पालक असतील आणि शिक्षक असतील या सर्वांकडून शासनाने सर्वे करून घेतला. सर्वे अंतिम असे लक्षात आलं की ते इंटिग्रेटेड पुस्तक तयार केलं होतं त्या पुस्तकामध्ये काही त्रुट्या आहेत आणि त्या त्रुट्या लक्षात आल्यानंतर शासनाने पुन्हा निर्णय घेतला आणि आता शासन आदेश काढला की पूर्वीप्रमाणेच पुस्तके असली गेली पाहिजेत. टाईम टेबल प्रमाणे जर पुस्तक आणली तर विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं सुद्धा कमी होईल असं मला वाटतं. वह्या ज्या आहेत त्या वह्या सुद्धा जर त्यांनी गरजेनुसार आणल्यात त्याच्यामध्ये कमी होऊ शकतात. पण त्याचे प्लानिंग व्यवस्थित करणे गरजेचे आहे. शाळेतल्या सगळ्या शिक्षकांना मी विनंती करतो आपण व्यवस्थित नियोजन करावे जेणेकरून विद्यार्थ्यांच्या पाठीवरती कोणत्याही प्रकारचं ओझं वाढणार नाही असे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे म्हणाले.




























