नाशिक दि.१ ( प्रमोद दळवी ) : नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामधील मुक्काम पोस्ट गोंदेगाव परिसरातील मरळगोई या ठिकाणी शेतकरी सिद्धोधन बनसोडे हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्याच ठिकाणी थोड्या अंतरावर त्यांची शेतजमीन आहे. त्या शेतातील गोठ्याबाहेर ते आपल्या गाईला बांधत असतात. काल रात्री नेहमीप्रमाणे ते गायला बांधून आपल्या घरी गेले. पहाटे साधारण पाचच्या सुमारास बिबट्याने त्यांच्या शेतात प्रवेश करून गाईवर हल्ला करून तिला ठार मारले. त्यानंतर त्यांनी तिला अर्ध फस्त केलं सकाळी बनसोडे हे आपल्या शेतात गेले असता त्यांना अर्धवट खाल्लेला गायचा मृतदेह दिसला. या घटनेमुळे बनसोडे कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आपल्या शेतातील गाय बिबट्याने खाल्ल्याने त्यांचे जवळपास ४० हजार रुपयांच्या नुकसान झाले आहे.
सरकारी डॉक्टरांनी त्या गाईचा पंचनामा केला असून आपल्याला शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी बनसोडे कुटुंबीयांनी केली आहे. त्या परिसरातील शिवारात बिबट्याचा वावर होत असल्याने शेतकरी वर्गांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने त्वरित या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी बनसोडे व इतर शेतकऱ्यांनी केली आहे. त्या परिसरात हा बिबट्या फिरत असल्याने शेतकऱ्यांना घाबरतच आपल्या शेतात जावे लागत आहे. जर वेळेच्या बिबट्याचा बंदोबस्त केला नाही तर तो बिबट्या परिसरातील नागरिकांवर ही हल्ला करू शकतो. या घटनेमुळे मरळगोई परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे





























