उल्हासनगर दि. १७ ( प्रमोद दळवी ) : शासनाच्या नव्या आदेशानुसार जन्म व मृत्यू प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत करण्यात आलेल्या बदलांमुळे ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या विलंबाचा सामना करावा लागत असून, त्यामुळे मानसिक त्रासही सहन करावा लागत असल्याची बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) ठाणे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संदीप माने यांची भेट घेऊन प्रक्रिया अधिक सुलभ करण्याची मागणी केली.
नवीन नियमांनुसार जन्म किंवा मृत्यूची नोंद झाल्यानंतर २१ दिवसांच्या आत अर्ज केल्यास संबंधित महानगरपालिका किंवा नगरपालिका जन्म-मृत्यू प्रमाणपत्र जारी करते. २१ ते ३० दिवसांच्या कालावधीत अर्ज केल्यास संबंधित अधिकाऱ्यांना वरिष्ठांच्या मंजुरीनंतर प्रमाणपत्र देण्याचा अधिकार आहे. मात्र ३० दिवसांनंतर केलेले अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवावे लागतात. जिल्हाधिकारी कार्यालयाची मंजुरी मिळाल्यानंतरच संबंधित नागरिकांना प्रमाणपत्र उपलब्ध होते. ठाणे जिल्ह्यात अनेक महानगरपालिका, नगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्था असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर अर्जांचा मोठा ताण पडत आहे. उपलब्ध माहितीनुसार, सध्या सुमारे ८ ते ९ हजार अर्ज प्रलंबित आहेत. त्यामुळे नागरिकांना अत्यावश्यक असलेले जन्म व मृत्यू प्रमाणपत्र वेळेत मिळत नसल्याने विविध शासकीय कामे, शैक्षणिक प्रवेश, वारसा हक्क, बँकिंग आणि इतर आवश्यक प्रक्रियांमध्ये अडचणी निर्माण होत आहेत.
या विलंबामागे तांत्रिक अडचणीही कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज मंजूर करण्यासाठी एकच शासकीय आयडी व पासवर्ड उपलब्ध असल्याने प्रत्येक अर्जाची पूर्तता करण्यासाठी किमान १५ ते २० मिनिटांचा कालावधी लागतो. सर्व्हर डाऊन असल्यास हा कालावधी आणखी वाढून एक तासापर्यंत पोहोचतो, त्यामुळे अर्ज निकाली काढण्याचा वेग मंदावतो. या समस्येवर तोडगा म्हणून मनसेचे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांनी शासनाने प्रत्येक महानगरपालिका व नगरपालिकेसाठी स्वतंत्र आयडी आणि पासवर्ड उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी निवासी उपजिल्हाधिकारी संदीप माने यांच्याकडे केली. यामुळे प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था स्वतःचे अर्ज अधिक वेगाने निकाली काढू शकेल, प्रलंबित अर्जांची संख्या कमी होईल आणि नागरिकांना वेळेत जन्म-मृत्यू प्रमाणपत्र मिळण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख,मनविसे शहर संघटक अशोक गरड,सुहास बनसोडे, राहुल राणे, नटवर वासिटा यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





























