उल्हासनगर दि. ३ ( प्रमोद दळवी ): उल्हासनगरमध्ये शांतीनगर स्मशानभूमीतील लोकवर्गणीतुन विनापरवाना उभारलेला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या ठिकाणाहून स्थलांतरित करण्यात यावा या मागणीसाठी शहरातील राजकीय पक्ष सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते व शहरातील आंबेडकरी अनुयायी महापालिकेकडे पाठपुरावा करीत होते. तसेच विविध आंदोलने ही केली होती. व गेल्या सहा दिवसापासून कायद्याने वागा लोक चळवळीचे अध्यक्ष राज असरोंडकर हे बेमुदत आमरण उपोषणाला बसले होते. अखेर महापालिकेने सोमवारी शांतीनगर स्मशानभूमीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा त्या ठिकाणाहून हटवला.
उल्हासनगरमध्ये शांतीनगर स्मशानभूमीतील आंबेडकरांचा पुतळा स्थलांतरित करण्याची मागणी करत आंबेडकरी अनुयायींनी यांनी नुकताच उल्हासनगर रेल्वे स्टेशन (पूर्व) बाहेर काळ्या फिती लावून मुकनिदर्शने केली होती. पालिका प्रशासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास हे आंदोलन आगामी काळात अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा ऍड. कल्पेश माने यांनी दिला होता. शांतीनगर स्मशानभूमी कॅम्प -३ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा बेकायदेशीरपणे बसवला गेला होता.त्याच्या यथोचित परवानग्यां सहित, इतरत्र सुरक्षित व शोभनीय जागेत स्थलांतरणाकरिता अनेक राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि आंबेडकरी अनुयायी सनदशीर मार्गाने प्रशासना कडे पाठपुरावा करत होते . परंतु, मनपा प्रशासन आणि जिल्हाधिकारी कार्यालया कडून कोणतीही ठोस भूमिका न घेतल्यामुळे कायद्याने वागा संघटनेचे राज असरोंडकर यांनी पुतळा हटविण्यासाठी उपोषण सुरू केल्यावर, प्रशासनाकडून सूत्र हलले.
गेल्या महासभेत लक्षवेधी सूचनेद्वारे वंचित बहुजन पक्षाच्या गटनेत्यांनी पुतळा हटविण्याची मागणी केली. मात्र महापौर अश्विनी निकम यांनी वंचित बहुजन पक्षाची लक्षावेधी सूचना फेटाळल्याने, त्यांच्या विषयी सर्वत्र संताप व्यक्त झाला होता . शहरांतील आंदोलनाची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेत, महापालिका आयुक्ताना पत्र पाठवून आपलेस्तरावरुन योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. अखेर सोमवारी शांतीनगर स्मशानभूमितीला डॉ आंबेडकर यांचा सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आला. असरोंडकर यांच्या आंदोलनाला अखेर यश आले असून महापौर अश्विनी निकम, आमदार डॉ. बालाजी किणीकर . शिवसेना.गटनेता अरुण आशान, शिंदेसेनेचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, रिपाईचे शहराध्यक्ष नाना बागुल, ,किरण सोनावणे, काँग्रेसचे रोहित साळवे,समाजसेवक शिवाजी रगडे यांच्यासह विविध पक्षाच्या नेत्यांनी असरोंडकर यांची भेट घेऊन, त्यांच्या आंदोलनाची सांगता केली. पुतळा हटविण्याच्या निमित्ताने शहरांत आंबेडकरी समाज एकवटल्याचे चित्र निर्माण झाले आहे.





























