- डम्पिंग ग्राउंड वरून महापालिकेत रणकंदन
- सुरक्षारक्षक आणि भाजपा नगरसेवकांमध्ये झटापटी
- शिवसेना सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भाजपा नगरसेवकांचे आंदोलन
उल्हासनगर दि. २२ ( प्रमोद दळवी ) : बुधवारी उल्हासनगर महानगरपालिकेच्या महासभेत शहरातील कॅम्प नंबर – ५ परिसरातील डम्पिंग ग्राउंडचा विषय न घेतल्याने भाजपचे नगरसेवक प्रधान पाटील, राजेश वानखेडे, राजू गोपलानी, विपुल मयेकर, रत्नमाला दुर्गे, ललिता पाटील, माजी नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांच्यासह अनेक सदस्यांनी उल्हासनगर महानगरपालिकेच्या मुख्यालयात प्रवेश करून प्रशासनाने आता जागे व्हावे डम्पिंग शहरा बाहेर न्यावे, डम्पिंग ग्राउंड हटाव शहर बचाव असा नारा देत पालिकेतच ठिय्या आंदोलन सुरू केले. भाजपा नगरसेवकाच्या या आक्रमक आंदोलनामुळे एकच गोंधळ उडाला, डम्पिंग ग्राउंडचा हा वाद पेटल्याने पालिकेच्या मुख्यालयात शिवसेना सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भाजपा नगरसेवकांचे आंदोलन पाहायला मिळाले

उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर -५ परिसरात डम्पिंग ग्राउंड आहे. या ठिकाणी शहरातील कचरा टाकण्यात येतो. टाकण्यात येणाऱ्या या कचऱ्यामुळे त्या परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय त्या ठिकाणी रोगराई देखील पसरत असल्याने लहान मुलांना देखील आजारपणाचा सामना करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांनी व त्या परिसरातील नगरसेवकांनी अनेक वेळा पालिका प्रशासनाला डम्पिंग ग्राउंड हटाव अशी मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. नुकताच भाजपाचे निवडून आलेले नगरसेवकांनी पालिका प्रशासनाला त्या डम्पिंग ग्राउंड हटवण्याबाबत विनंती केली होती. कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने, याशिवाय ज्या परिसरातील नागरिकांनी आपल्याला निवडून दिले, व त्या नागरिकांना आपण डम्पिंग ग्राउंड त्या ठिकाणाहून हटवू अशा आश्वासन दिले असताना देखील पालिका प्रशासन या डम्पिंग ग्राउंड बाबत कोणतीच भूमिका घेत नसल्याचे नगरसेवक प्रधान पाटील यांनी सांगितले. बुधवारी उल्हासनगर महापालिकेची महासभा असल्या त्या महासभेत डंपिंग ग्राउंडचा विषय घेण्यात यावा अशी मागणी देखील भाजपच्या नगरसेवकांनी केली होती. पण हा विषय न घेतल्याने आक्रमक झालेल्या भाजपच्या सहा नगरसेवकांनी कार्यकर्त्यांसह विशेषतः त्या परिसरातील महिलांसह हातात डम्पिंग ग्राउंड हटाव शहर बचाओ, प्रशासनाने आता जागे व्हावे डम्पिंग ग्राउंड शहर बाहेर न्यावे असे बॅनर घेऊन पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच उभे राहिले. महापौर अश्विनी निकम हे महापालिकेत येतात डम्पिंग ग्राउंड संदर्भात आंदोलन करणाऱ्या भाजपच्या नगरसेवकांनी महापौर यांना थांबवत विचारणा केली असता महापौर यांनी आंदोलन कर्त्यांना बाजूला करत ते थेट पालिकेत गेल्या. त्यामुळे डम्पिंग ग्राउंड संदर्भात आंदोलन करणाऱ्या महिलांसह भाजपच्या सहा नगरसेवकांनी संताप व्यक्त करत महापालिकेच्या मुख्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुरक्षारक्षकांसोबत झटापटी झाली.

या डम्पिंग ग्राउंड मुळे त्या परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून देखील पालिका गप्प का असा संताप सवाल त्यावेळी महिला करीत होत्या. त्यावेळी काही महिलांनी सांगितले की महापौर डम्पिंग ग्राउंडच्या इथे आल्या होत्या त्या पाच मिनिटे देखील तिथे या दुर्गंधीमुळे थांबू शकला नाही . आम्ही बऱ्याच महिन्यापासून त्या ठिकाणी या दुर्गंधीचा सामना करत आहे. त्या परिसरातील लहान मुलांना श्वासाचा त्रास देखील होऊ लागला आहे. काही मुलांना अस्थमा देखील झाला आहे. निवडून आलेल्या नगरसेविका यांनी सांगितले महापौर मॅडम यांनी आमच्याकडे देखील लक्ष द्यायला हवे. आम्ही डम्पिंग ग्राउंड परिसरात राहणारे रहिवासी असल्याने नागरिक आम्हालाच प्रश्न विचारत आहे. महापौर यांनी हा प्रश्न त्वरित सोडवावा अशी आमची मागणी आहे असे नगरसेवकांनी सांगितले. याशिवाय महापौर यांनी एक महिन्याच्या आत डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न सुटेल अशा आश्वासन दिले होते. पण अद्याप पर्यंत हा प्रश्न सुटला नाही असे नगरसेवक प्रधान पाटील यांनी सांगितले. कॅम्प नंबर -५ ही संतांची भूमी आहे. या डम्पिंग ग्राउंड मुळे काही संत बाहेर जाऊन राहत आहेत. आज या डम्पिंग ग्राउंडचा विषय संदर्भात आम्ही इथे आंदोलनाला बसलो असल्याचे नगरसेवकाने सांगितले. आम्ही सत्तेत जरी असलो तरी हा प्रश्न सामान्य जनतेचा आहे. जनतेने आम्हाला निवडून दिला आहे. त्यामुळे आज आम्हाला डम्पिंग ग्राउंड संदर्भात ही आक्रमक भूमिका हाती घ्यावी लागली असे नगरसेवकांनी सांगितले.

२०१७ साली कॅम्प नंबर -५ परिसरात अनधिकृत पणे हे डम्पिंग ग्राउंड बसवण्यात आले आहे असे प्रधान पाटील यांनी सांगितले. याशिवाय शासनाने जबरदस्तीने जनतेवर लादलेला हा प्रकार असल्याचेही प्रधान पाटील यांनी सांगितले. याशिवाय त्या डम्पिंग ग्राउंडच्या परिसरात शाळा आहे त्यात ७०० विद्यार्थी देखील शिकत आहेत. बाजूला पाण्याची टाकी देखील आहे. त्या टाकीतून जवळपास ५० हजार नागरिक पाणी पिते. या डम्पिंग ग्राउंड मुळे दूषित पाण्याचा सामना देखील नागरिकांना करावा लागत आहे. असे देखील प्रधान पाटील यांनी सांगितले. या शहरांमधून हे डम्पिंग ग्राउंड पालिकेने बाहेर न्यावे व पालिकेने त्या परिसरातील नागरिकांचा हा त्रास दूर करावा अशी आमची मागणी असल्याचे भाजपा नगरसेवकांनी सांगितले. काही दिवसात डम्पिंग ग्राउंडचा हा प्रश्न सुटला नाही तर आम्ही सहाच्या सहा नगरसेवक उपोषणाला बसणार असल्याचे प्रधान पाटील यांनी सांगितले. महासभा सुरू असताना देखील भाजपच्या नगरसेवकांनी डम्पिंग ग्राउंड संदर्भात ठिय्या आंदोलन केलेत्यामुळे डम्पिंग ग्राउंडच्या प्रश्नावरून सेना भाजपामध्ये जुंपली असल्याचे दिसून आले.

सुरू असलेल्या महासभेत डम्पिंग ग्राउंड संदर्भात ठिय्या आंदोलनाला बसलेल्या भाजपच्या नगरसेवकांना भाजपचे गटनेता राजेश वधारिया यांनी त्यांना उठवले आणि सांगितले की पुढील वेळेस विशेष महासभा लावून पहिले डम्पिंग ग्राउंडच्या प्रश्नवर चर्चा होईल असे आश्वासन दिल्यावर ते आंदोलन मागे घेण्यात आले.या महासभेमध्ये काँग्रेसच्या नगरसेविका अंजली साळवे यांची विरोधी पक्ष नेता म्हणून निवड घोषित करण्यात आल्याने महासभेत एकच गदारोळ निर्माण होऊन वातावरण तापले होते.




























