उल्हासनगर दि.२२ ( प्रमोद दळवी ) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच स्वर्गीय माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे आणि तहसीलदार कार्यालय उल्हासनगर यांच्या संयुक्त विद्यमाने उल्हासनगर- ३ येथील टाऊन हॉलमध्ये “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर (२०२६-२७)” मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आले.

नागरिकांना विविध शासकीय योजना आणि सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरामध्ये आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती, आयुष्मान भारत कार्ड, नवीन रेशन कार्ड, नवीन वीज जोडणी, दिव्यांग कल्याणकारी योजना, संजय गांधी निराधार योजना, घरकुल योजना, उत्पन्न, अधिवास व ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, मातृत्व वंदना योजना, लेक लाडकी योजना, जिवंत ७/१२ अभियान, शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमण नियमितीकरण, मोफत आरोग्य तपासणी तसेच रक्तदान शिबिर अशा विविध लोककल्याणकारी सेवांचा लाभ नागरिकांना देण्यात आला.

यावेळी आमदार कुमार आयलानी यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना सांगितले की, राज्य शासनाच्या जनहितकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे हा या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचा मुख्य उद्देश आहे. शासनाच्या विविध योजनांचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. अशा प्रकारची शिबिरे नागरिकांना शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या न मारता एकाच छताखाली अनेक सेवा उपलब्ध करून देत असल्याने त्यांचा मोठा फायदा होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, तहसीलदार कल्याणी कदम, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष राजेश वधरिया यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना विविध योजनांची माहिती देत अर्ज स्वीकारण्याची आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याची प्रक्रिया सुलभ केली.

शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवून विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ घेतला. एकाच ठिकाणी अनेक महत्त्वाच्या सेवांची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले. शासनाच्या लोकाभिमुख उपक्रमांमुळे सामान्य नागरिकांचा वेळ, श्रम आणि खर्च वाचत असून अशा प्रकारची शिबिरे भविष्यातही नियमितपणे आयोजित करण्यात यावीत, अशी अपेक्षा उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचा समारोप शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या संकल्पासह करण्यात आला. महसूल विभागाच्या या उपक्रमामुळे नागरिक-केंद्रित प्रशासनाचा प्रभावी नमुना पाहायला मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.





























