उल्हासनगर दि.१ ( प्रमोद दळवी ) : सतत पडत असणाऱ्या अतिमुसळधार पावसामुळे बीड, संभाजीनगर, मराठवाडा आदी परिसरात शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पूर परिस्थितीमुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहे. अशा परिस्थितीत त्यांना मदतीची आवश्यकता असल्याने उल्हासनगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतपेढी मर्यादित संस्थेमार्फत पदाधिकारी व सर्व संचालक मंडळी तसेच कर्मचारी वर्गांनी पूरग्रस्तांना मदत करण्याकरिता आपल्या परीने आर्थिक मदत देत सुमारे एक लाख एक हजार रुपयाचा धनादेश उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्रीम.मनिषा आव्हाळे यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सुपूर्त करण्यात आला आहे.
गेल्या आठवड्याभरात सतत कोसळणाऱ्या अति मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील बीड. संभाजीनगर, जालना आशा अनेक गावात व शहरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे आलेले पिक देखील या पुरामध्ये वाहून गेले आहेत. अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. पूर परिस्थितीमध्ये नुकसान झालेले नागरिक मदतीसाठी टाहो फोडत आहेत. अशावेळी आपण देखील समाजाला काहीतरी देणं लागतं हा हेतू मनाशी बाळगत महाराष्ट्रातून अनेक जणांनी मदतीचा हात पुढे केला आहे. उल्हासनगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतपेढी मर्यादित संस्थेमार्फत देखील पूरग्रस्तांना मदत करण्याकरिता संस्थेच्या पार पडलेल्या मासिक सभेत ठराव करत संस्थेच्या सर्व संचालक मंडळी व कर्मचाऱ्यांनी एकजुटीने आपल्या परीने मदत केली. पूरग्रस्तांना संस्थेमार्फत मदत म्हणून एक लाख एक हजार रुपयाचा धनादेश उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्रीम.मनिषा आव्हाळे यांच्याकडे .मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सुपूर्त करण्यात आला. उल्हासनगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतपेढी मर्यादित संस्थेचे विनोद अभिमन्यू केणे( अध्यक्ष ),एकनाथ उदयसिंग पवार(उपाध्यक्ष),अच्युत बुधाजी सासे(सचिव),.बाळासाहेब शिवाजी सांगळे(व्यवस्थापक) यांनी सर्व संचालक मंडळी व कर्मचारी यांनी पूरग्रस्तांना आर्थिक मदत दिल्याने त्यांचे आभार प्रकट केले आहे.





























