उल्हासनगर दि. २९ ( प्रमोद दळवी ) : भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी आमदार कुमार आयलानी आणि भाजप पदाधिकाऱ्यांसह महाराष्ट्रातील विविध महानगरपालिकांमध्ये उघडकीस आलेल्या कथित जन्म दाखला घोटाळ्यासंदर्भात उल्हासनगरच्या महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांची शुक्रवारी भेट घेतली. या घोटाळ्याच्या गंभीरतेवर सविस्तर चर्चा करण्यात आली आणि निष्पक्ष चौकशीची मागणी करण्यात आली.

पत्रकारांशी बोलताना किरीट सोमय्या यांनी सांगितले की, मुंबई महानगरपालिकेत अंदाजे २०,००० बनावट जन्म दाखले जारी करण्यात आले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी (SIT) स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. जुन्या नोंदणीचे नूतनीकरण करण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचा आरोप त्यांनी केला.

किरीट सोमय्या यांनी पुढे सांगितले की, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातही अंदाजे २५,००० संशयास्पद आणि बनावट जन्म दाखले जारी करण्यात आल्याचा संशय आहे. महाराष्ट्रात आधी पहिल्या टप्प्यात आम्ही जन्म प्रमाणपत्र घोटाळे काढले त्यात ५५ ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महानगर मध्ये कारवाई होत नाही म्हणून स्वतः मुख्यमंत्री यांनी लक्ष घातले आहे. मुंबईसाठी एसआयटी बनवली आहे. या व्यतिरिक्त राज्यातील इतर १२ महानगरपालिकांमध्येही १५ दिवसात चौकशी केली जाईल. त्यांनी सांगितले की, जन्म दाखला घोटाळा हा केवळ कागदपत्रांमधील फसवणूक नसून, देशाच्या नागरिकत्व प्रणालीचे गंभीर उल्लंघन आहे. अशा प्रकरणांतील दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. महानगरपालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी या प्रकरणाची अंतर्गत चौकशी करण्याचे आश्वासन दिले.
महानगरपालिका आयुक्तांसोबत झालेल्या चर्चेदरम्यान भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया, उपमहापौर अमर लुंड, प्रशांत पाटील, लाल पंजाबी, संजय सिंह चाचा, टोनी सिरवानी, अर्चना अर्चना करणकाळे, पिंटू भाटीजा, कांचन लुंड, बाळा श्रीखंडे, सतीश मराठे, प्रीती विनोद मखिजा यांच्यासह इतर अनेक नगरसेवक, भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.





























