उल्हासनगर दि. २४ ( प्रमोद दळवी ) : जंतर-मंतर, नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांवर झालेल्या कथित पोलिसी कारवाईची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, दोषी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच आंदोलनात सहभागी विद्यार्थी व नागरिकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत, या प्रमुख मागण्यांसाठी सर्वपक्षीय एकता समिती उल्हासनगर शहर यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा आणि तहसीलदार कल्याणी कदम यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गेल्या ३५ ते ४० दिवसांपासून देशभरातील विद्यार्थी आपल्या विविध न्याय्य मागण्यांसाठी जंतर-मंतर येथे शांततामय आंदोलन करत आहेत. मात्र, आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर कथितपणे लाठीमार करून अमानुष वागणूक दिल्याचे आरोप समोर आले आहेत. या कारवाईत अनेक विद्यार्थ्यांच्या डोक्याला गंभीर दुखापती झाल्याचा दावा करण्यात आला असून महिला विद्यार्थिनींशी गैरवर्तन, त्यांच्या कपड्यांची ओढाताण झाल्याचे तसेच काही विद्यार्थ्यांना विजेचे धक्के (इलेक्ट्रिक शॉक) दिल्याच्या तक्रारीही पुढे आल्याचे निवेदनात म्हटले आहे. या संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय, निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्या संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी समितीने केली आहे. तसेच दिनांक २० पासून सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी विद्यार्थी व नागरिकांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे तात्काळ मागे घेऊन त्यांची विनाअट मुक्तता करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहार, पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील गंभीर त्रुटींमुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचीही निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा किंवा त्यांच्याकडून राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. सर्वपक्षीय एकता समितीकडून १)जंतर-मंतर येथील विद्यार्थी आंदोलनावरील पोलिसी कारवाईची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.२) दोषी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. ३) आंदोलनात सहभागी विद्यार्थी व नागरिकांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावेत.४) NEET परीक्षा प्रकरणातील कथित घोटाळा, पेपरफुटी व संबंधित सर्व बाबींची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.५) केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची नैतिक जबाबदारी निश्चित करून त्यांचा तत्काळ राजीनामा घेण्यात यावा. या प्रमुख मागण्या निवेदनांद्वारे करण्यात आल्या आहेत .
यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शरद पाटील, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र साहू, शहरप्रमुख शिवाजी जावळे, विभागप्रमुख आदिनाथ पालवे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहित साळवे, विरोधी पक्षनेत्या अंजली साळवे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सौ. सीमा आहुजा, मनसेचे जिल्हा संघटक दिलीप थोरात, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भीमसेन मोरे, महानगरप्रमुख दिलीप मिश्रा, शहरप्रमुख प्रशांत धांडे तसेच आम आदमी पार्टीचे अमित सिन्हा यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. विद्यार्थ्यांवरील कथित अन्यायाच्या घटनांची निष्पक्ष चौकशी करून दोषींना शिक्षा देण्यात यावी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाने तातडीने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी सर्वपक्षीय एकता समितीने या निवेदनाद्वारे केली आहे.





























