उल्हासनगर दि. १६ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगरच्या आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा देणारा ऐतिहासिक निर्णय घेत, मध्यवर्ती उपजिल्हा रुग्णालयातील खाटांची संख्या २०२ वरून थेट ५०० करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे उल्हासनगरसह अंबरनाथ, बदलापूर, वांगणी, शेलू, मुरबाड आणि शहापूर परिसरातील लाखो नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत.

उल्हासनगर महानगरपालिकेच्या आरोग्य परीक्षण व वैद्यकीय सहाय्य समितीच्या सभापती सविता प्रवीण तोरणे (रगडे) यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि व कल्याण लोकसभेचे खासदार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून ही महत्त्वपूर्ण मागणी केली होती. १७ मे २०२६ रोजी माजी आमदार पप्पू कलानी यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र चौधरी, ज्येष्ठ नगरसेवक जमनू पुरसवानी, महेश सुखरामाणी, कमलेश निकम आणि शिवाजी रगडे उपस्थित होते. या भेटीदरम्यान शिवाजी रगडे यांनी उल्हासनगरच्या मध्यवर्ती उपजिल्हा रुग्णालयाच्या सर्वांगीण उन्नतीकरणाची (अपग्रेडेशन) आणि खाटांची संख्या वाढविण्याची मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसमोर मांडली. या मागणीची गांभीर्याने दखल घेत उपमुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ आरोग्यमंत्री आणि खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांना मध्यवर्ती रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
रुग्णालयावरील वाढता ताण, वाढती रुग्णसंख्या आणि अपुऱ्या सुविधांची दखल घेत शासनाने या मागणीला मंजुरी देण्याच्या सूचना दिल्या.या मंजुरीनंतर रुग्णालयातील खाटांची संख्या २०२ वरून ५०० पर्यंत वाढविण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार नवीन डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. तसेच अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, आधुनिक सुविधा आणि आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून रुग्णालय अधिक सक्षम करण्यात येणार आहे. यामुळे एकाच खाटेवर दोन रुग्णांना उपचार घ्यावे लागणे किंवा जमिनीवर गाद्या टाकून उपचार करण्याची वेळ येणार नाही. याचबरोबर कामगार रुग्णालयाचा देखील सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, त्याची क्षमता २०० ते ३०० खाटांपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव पुढे नेण्यात येत आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर केवळ कामगारांनाच नव्हे, तर आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना अंतर्गत पात्र असलेल्या सर्वसामान्य नागरिकांनाही अत्याधुनिक आणि दर्जेदार आरोग्य सेवा कामगार रुग्णालयात उपलब्ध होणार आहेत.
तसेच शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या विकासासाठी खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आधुनिक सुविधा, वैद्यकीय उपकरणे आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होऊन नागरिकांना त्यांच्या परिसरातच उपचार मिळणे अधिक सुलभ होणार आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना या बद्दल सातत्यपूर्ण पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते व रुग्णमित्र शिवाजी रगडे म्हणाले, “उपजिल्हा रुग्णालयाचे ५०० खाटांमध्ये रूपांतर, कामगार रुग्णालयाचा विस्तार आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सक्षमीकरण हे उल्हासनगरच्या आरोग्य व्यवस्थेसाठी ऐतिहासिक पाऊल आहे. या निर्णयामुळे लाखो नागरिकांना दर्जेदार उपचार स्थानिक पातळीवर मिळतील आणि उपचारांसाठी ठाणे किंवा मुंबईला जाण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होईल. हा सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि लोकहिताचा निर्णय आहे.” याबद्दल खासदार डॉ श्रीकांत शिंदे साहेब यांचे विशेष आभार व्यक्त केले





























