उल्हासनगर दि . २० ( प्रमोद दळवी ) : जिजामाता कॉलनी परिसरात सुरू असलेल्या कल्व्हर्ट (Culvert) बांधकामावर परिसरातील नागरिकांनी गंभीर आक्षेप घेत निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात माजी नगरसेवक भरत गंगोत्री यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्या. नागरिकांनी कामाच्या दर्जाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने अभियंत्यांकडून पाहणी करून योग्य पद्धतीने कल्व्हर्ट बांधण्याची मागणी केली आहे.

स्थानिकांच्या व माजी नगरसेवक भरत गंगोत्री यांच्या म्हणण्यानुसार,येथे जुन्या नाल्याऐवजी नियोजनानुसार नवीन कल्व्हर्ट उभारला जाणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात नाल्याचे कामच सुरू असून, आवश्यक त्या आकारमानाचे कल्व्हर्ट न बांधता अर्धगोलाकार (हाफ राऊंड) पाइप टाकून काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे भविष्यात पुन्हा नाला तुंबण्याची आणि पावसाळ्यात परिसरातील घरांमध्ये पाणी शिरण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

माजी नगरसेवक भरत गंगोत्री यांचे म्हणणे आहे की, या भागात पावसाच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात प्रवाह येतो. रस्त्याचा उतार एका नाल्यावर असल्याने संपूर्ण पाणी याच मार्गाने वाहते. त्यामुळे नाल्याची खोलवर साफसफाई करून योग्य उतार (स्लोप) देणे आवश्यक होते. मात्र ठेकेदाराने नाल्यातील गाळ आणि माती न काढताच थेट पाइप टाकण्याचे काम सुरू केल्याचा आरोप करण्यात आला आहे. परिसरातील नागरिकांनी सांगितले की, मागील काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये चार ते सहा फूट पाणी शिरले होते. त्यानंतर प्रशासनाने मोठा कल्व्हर्ट उभारण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सध्या सुरू असलेले काम पाहता पूर्वीचीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.नागरिकांनी असेही सांगितले की, सकाळपासून ठेकेदार कामाच्या ठिकाणी उपस्थित नव्हता. कामाच्या पद्धतीबाबत विचारणा केली असता समाधानकारक उत्तर देण्यात आले नाही. उलट प्रश्न विचारणाऱ्या नागरिकांशी उद्धटपणे वागणूक दिली जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

परिसरातील महिला वर्गानेही या कामाविरोधात संताप व्यक्त केला असून, “निकृष्ट कामामुळे भविष्यात पुन्हा पूरस्थिती निर्माण होणार असेल तर अशा प्रकारचे काम स्वीकारले जाणार नाही,” अशी भूमिका त्यांनी मांडली.नागरिकांनी व माजी नगरसेवक भरत गंगोत्री यांनी महानगरपालिका आयुक्त, महापौर,संबंधित अभियंते आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन कामाची पाहणी करावी, तांत्रिकदृष्ट्या योग्य आराखड्यानुसार कल्व्हर्ट बांधण्याचे आदेश द्यावेत आणि दर्जेदार कामाची खात्री करावी, अशी मागणी केली आहे. तसेच काम पूर्ण होण्यापूर्वी संबंधित अभियंत्यांकडून अंतिम तपासणी करूनच पुढील बांधकामाला परवानगी द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे





























