उल्हासनगर दि ४ : उल्हासनगर शहरात सखोल स्वच्छता अभियानाची दमदार सुरुवात करण्यात आली असून, हे अभियान संपूर्ण शहरभर टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे.

महानगरपालिकेच्या आरोग्य सभापती सौ. सविता तोरणे रगडे यांच्या सूचनेनुसार या विशेष स्वच्छता मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. या अभियानाचा शुभारंभ महापौर सौ. अश्विनी कमलेश निकम यांच्या नेतृत्वाखाली पॅनल क्रमांक ७ पासून करण्यात आला. आज पार पडलेल्या स्वच्छता अभियानात महापौर सौ. अश्विनी कमलेश निकम, नगरसेवक दुर्गा राय, समाजसेवक शिवाजी रगडे तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. संबंधित पॅनेल हे शहरातील अग्रगण्य पॅनेल असून, येथे सुमारे ७० टक्के कचरा वर्गीकरणाद्वारे संकलित केला जातो. या उपक्रमामुळे स्वच्छतेबाबत जनजागृतीसह कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यावर भर दिला जात आहे.

अभियानांतर्गत विविध रस्त्यांची सखोल स्वच्छता करण्यात आली. तसेच रस्त्यांवर ठेवण्यात आलेल्या अनावश्यक वस्तूंवर धडक कारवाई करून त्या हटवण्यात आल्या. या मोहिमेची सुरुवात पॅनेल क्रमांक ७ मधून करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने संपूर्ण शहरातील प्रत्येक रस्त्यावर हे स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असून, केवळ कचरा हटवणे नव्हे तर रस्त्यांवरील धूळ, दगड व इतर अडथळे दूर करण्याबाबतही संबंधित विभागांना निर्देश देण्यात आले आहेत. लवकरच शहरातील सर्व २० पॅनेल्सचे स्वच्छता अभियानाचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून “स्वच्छ उल्हासनगर, सुंदर उल्हासनगर” या उद्दिष्टपूर्तीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.





























