- लुटमार करण्याच्या इराद्याने हल्ला केल्याची शक्यता
- पोलिसांनी नशेखोर टोळीचा बंदोबस्त करण्याची मागणी
उल्हासनगर दि १४ ( प्रमोद दळवी ) : रेल्वे प्रवाशांच्या आणि नागरिकांच्या सोयीसाठी उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळ स्काय वॉक बनवण्यात आले आहे. या स्काय वॉकची देखभाल करण्यात येत नसल्याने हा स्काय वॉक आता नशेखोर , गांजाडी यांचा एक प्रकारे अड्डा बनला आहे. रात्री कामावरून घरी जाणाऱ्या इसमावर स्काय वॉक वर उभ्या असलेल्या सहा जणांच्या नशेखोर टोळीने त्या इसमाला लुटण्याच्या इराद्याने त्याला अडवून त्याच्यावर जीवघेणे हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात तो इसन गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगरात राहणारे हरीओम दिवेदी हे कामावरून रात्री साडेनऊच्या सुमारास उल्हासनगर रेल्वे स्थानकातील ओवर ब्रिजवरून ( स्काय वॉकवरून ) घरी जात होते. ते मोबाईलवर बोलत घरी चालले होते. त्यावेळी त्या ठिकाणी सहा जणांची नशेखोर टोळी उभी होती. त्यांनी हरीओम यांना पाहताच या ठिकाणाहून का चालला आहेस असे दम देत विचारले. हरिओम बोलले या ठिकाणाहून जाणं काय गुन्हा आहे का, असे बोलताच ते संतापले त्यांनी आपापसात बोलणे करत हरीओम यांच्याकडे आले. त्यावेळी हरीओम यांनी माझं घर इथेच आहे मी रोजच या ठिकाणाहून जातो असे सांगताच त्यांनी लादी उचलून हरीओम यांच्या डोक्यात घातली. हरी ओम हे जखमी झाले त्यांच्या डोक्यातून रक्त वाहत होते. अशा जखमी अवस्थेत असताना देखील हरीओम यांनी त्या ठिकाणाहून पळत असणाऱ्या सहा जणांपैकी एकाला पकडले.त्यावेळी त्या तरुणाने दोन जणांची नावे हरीओम यांना सांगितले आहेत. कदाचित या टोळीने मोबाईल लुटण्याच्या बहान्याने हरिओम यांना मारहाण केल्या असल्याचे ते सांगत आहेत. या घटनेमुळे उल्हासनगर रेल्वे स्थानकात भीतीचे वातावरण पसरले असून. या नशेखोर टोळीचा पोलिसांनी त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी सर्वत्र केली जात आहे.
या ओवर ब्रिज वरून जाताना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले असते. या ठिकाणी रोज सायंकाळी आणि रात्री नशेखोर टोळी वावरत असते. या आधी देखील या ओवर ब्रिजवर अनेक प्रकारच्या लूटमारीच्या आणि मारहाणीच्या घटना झाल्या आहेत. या ठिकाणी कोणत्याच प्रकारचा पोलीस गस्त नसल्याने असे प्रकार वारंवार घडत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. उल्हासनगर रेल्वे स्थानकाचा हा ओव्हर ब्रिज नशेखोर टोळीचा अड्डा बनला आहे . वेळीच पोलिसांनी या ठिकाणी या नशेखोर टोळीचा बंदोबस्त केला नाही तर आणखीन अनुचित प्रकाराच्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हरीओम यांनी उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात उपचार केले असून पोलिसांनी या नशेखोर टोळीचा शोध घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.





























