उल्हासनगर दि.३१ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना अद्यापही गणवेश व आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शाळा सुरू होऊन जवळपास दीड महिना उलटून गेला असतानाही विद्यार्थ्यांना गणवेश, वह्या, लेखन साहित्य, दप्तर, रेनकोट, पाण्याची बाटली, एक जोडी बूट आणि दोन जोडी पायमोजे मिळाले नसल्याचा मुद्दा उपस्थित करत ‘एक हात मदतीचा’ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय कदम यांनी उल्हासनगर महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.
हे निवेदन महापौर, आयुक्त, शिक्षण समितीचे सभापती, शिक्षण विभागाचे उपायुक्त तसेच प्रशासन अधिकारी (शिक्षण विभाग) यांना देण्यात आले असून विद्यार्थ्यांना तातडीने आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. विजय कदम यांनी निवेदनात नमूद केले आहे की, बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण अधिकार नियम तसेच विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षणातील गळतीचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने शासनाने शासन निर्णय क्र. एसएसए-१२२०/प्र.क्र.१५४/एस.डी.-३, दिनांक २ एप्रिल २०२५ जारी केला आहे. या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेशाचा संच व आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. मात्र, प्रत्यक्षात या आदेशाची अंमलबजावणी झालेली नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, महापालिकेच्या शाळांमध्ये प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू कुटुंबांतील मुले शिक्षण घेतात. खासगी शाळांची फी परवडत नसल्यामुळे पालक आपल्या मुलांना महापालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश देतात. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना वेळेवर गणवेश, वह्या व इतर आवश्यक साहित्य न मिळाल्यास त्यांच्या शिक्षणावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर तसेच भविष्यातील प्रगतीवरही परिणाम होऊ शकतो, अशी चिंता विजय कदम यांनी व्यक्त केली आहे. याशिवाय, महापालिका मराठी व हिंदी माध्यमासोबत इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले जात असताना, विद्यमान विद्यार्थ्यांनाच मूलभूत शैक्षणिक सुविधा वेळेवर उपलब्ध होत नसल्याची वस्तुस्थिती चिंताजनक असल्याचेही त्यांनी नमूद केले. मराठी व हिंदी माध्यमातील विद्यार्थ्यांनाच आवश्यक साहित्य मिळत नसल्यास नव्याने सुरू होणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची परिस्थिती काय असेल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून प्रशासनाने तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, प्रलंबित गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वितरण युद्धपातळीवर पूर्ण करावे आणि भविष्यात अशा प्रकारचा विलंब होणार नाही यासाठी प्रभावी नियोजन करावे, अशी मागणी विजय कदम यांनी निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, पालकांमधूनही या विलंबाबाबत नाराजी व्यक्त होत असून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेश तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरत आहे. आता महानगरपालिका प्रशासन यावर कितपत तत्परतेने कार्यवाही करते, याकडे विद्यार्थी, पालक आणि शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.





























