उल्हासनगर दि.९ ( प्रमोद दळवी ): वंचित बहुजन आघाडीच्या राज्यव्यापी भव्य सभासद नोंदणी अभियान २०२६ अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर येथे मोठ्या उत्साहात सभासद नोंदणी अभियान राबविण्यात आले. ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज पवार यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या अभियानासाठी आकर्षक व सुसज्ज टेंट उभारण्यात आले होते. विविध वसाहतींमध्ये आयोजित करण्यात आलेल्या नोंदणी केंद्रांवर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सभासद नोंदणी केली. विशेषतः महिलांचा उल्लेखनीय सहभाग दिसून आला. अनेक भगिनींनी मोठ्या उत्साहाने नोंदणी करून परिवर्तनाच्या चळवळीला पाठिंबा दर्शविला. तसेच युवक, पुरुष आणि विविध घटकांतील नागरिकांनीही अभियानात सक्रिय सहभाग नोंदवत वंचित बहुजन आघाडीच्या विचारांवर विश्वास व्यक्त केला. कार्यकर्त्यांच्या प्रभावी नियोजनामुळे आणि सातत्यपूर्ण मेहनतीमुळे संपूर्ण अभियानाला उत्सवाचे व जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले. या यशस्वी अभियानामुळे ठाणे जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या संघटनात्मक बळकटीला चालना मिळाल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. आगामी काळातही राज्यभर अशाच पद्धतीने सभासद नोंदणी अभियान अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असल्याची माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.





























