उल्हासनगर दि ७ ( प्रमोद दळवी ) : सामाजिक बांधिलकी जपत समाजपरिवर्तनासाठी सातत्याने रचनात्मक उपक्रम राबवणारे सुधीर पितांबर बागुल यांनी आता तळागाळातील कष्टकरी वर्गासाठी एक महत्त्वाकांक्षी आणि परिवर्तनशील उपक्रम हाती घेतला आहे — “हातगाडी मुक्त अभियान”.

महिला सबलीकरण, रोजगार निर्मिती, आर्थिक सक्षमीकरण आणि पर्यावरण संवर्धन अशा विविध क्षेत्रांत कार्य करत असताना त्यांनी शहरातील हातगाडीवर उदरनिर्वाह करणाऱ्या छोट्या उद्योजकांच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिले. भाजी विक्रेते, फळ विक्रेते, चणे-फुटाणे विक्रेते, फेरीवाले आणि हातगाडी चालक दिवसाचे अनेक तास प्रचंड शारीरिक श्रम करत व्यवसाय करतात. सतत हातगाडी लोटल्यामुळे त्यांच्या शरीरावर मोठा ताण येतो, तर उत्पन्न मात्र मर्यादितच राहते. याच पार्श्वभूमीवर “श्रम कमी — मोबदला जास्त” या संकल्पनेतून “हातगाडी मुक्त अभियान” सुरू करण्यात आले आहे.
या अभियानांतर्गत हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांना शासनाच्या विविध योजनांद्वारे मालवाहू ई-रिक्षा उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे. यामुळे कष्टकरी वर्गाचा शारीरिक ताण कमी होऊन त्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. तसेच त्यांना अधिक सन्मानाने आणि आधुनिक पद्धतीने व्यवसाय करता येणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेत सुधीर बागुल हे केवळ मार्गदर्शक म्हणून नव्हे, तर सहप्रवासी म्हणून काम करत आहेत. लाभार्थ्यांचे कर्जप्रकरण, शासकीय अनुदानासाठी आवश्यक कागदपत्रे, आरटीओ प्रक्रिया, ई-रिक्षा लायसन्स आणि विविध शासकीय औपचारिकता पूर्ण करण्यासाठी ते प्रत्यक्ष मदत करत आहेत. त्यामुळे शासनाच्या योजना प्रत्यक्ष गरजूंपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यास मोठी मदत होत आहे. शासनाच्या योजना या अत्यंत विचारपूर्वक तयार केल्या जातात मात्र त्यांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी प्रशासन आणि सामाजिक संस्था यांच्यात समन्वय असणे आवश्यक असते. “हातगाडी मुक्त अभियान” हे त्या सकारात्मक समन्वयाचे प्रभावी उदाहरण ठरत आहे. सामाजिक संस्था आणि प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नांतून आर्थिक सक्षमीकरणाचे सक्षम मॉडेल उभे राहू शकते, हे या उपक्रमाने सिद्ध केले आहे.
हे अभियान केवळ ई-रिक्षा वितरणापुरते मर्यादित नसून कष्टकरी वर्गाच्या आयुष्यात आत्मविश्वास, सन्मान आणि प्रगतीची नवी दिशा निर्माण करणारे सामाजिक आंदोलन बनत आहे. रचनात्मक सामाजिक परिवर्तनाचा हा प्रयत्न समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. या यशानंतर सुधीर बागुल यांनी २०२६-२७ या आर्थिक वर्षात आणखी १०० ई-रिक्षा उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला आहे. तसेच महापालिका क्षेत्रातील नोंदणीकृत हॉकर्ससाठी स्वतंत्र अभियान राबवण्याची तयारी सुरू असून सामाजिक कार्य म्हणजे केवळ मदत नव्हे, तर माणसाच्या आयुष्यात दीर्घकालीन सकारात्मक बदल घडवणे होय. “हातगाडी मुक्त अभियान”च्या माध्यमातून सुधीर बागुल यांनी हा बदल प्रत्यक्षात घडवून दाखवनार आहेत. कष्टकरी हातांना आता केवळ श्रमाची नव्हे, तर प्रगतीचीही गती मिळत आहे. या उपक्रमासाठी अर्ज भरण्याकरिता सुधीर पितांबर बागुल मोबाईल नंबर ९३७११५९७२९ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे





























