उल्हासनगर दि ५ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर – ५ मध्ये २०१७ पासून तयार केलेल्या बेकायदेशीर डम्पिंग ग्राउंड मुळे नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. त्या ठिकाणाहून हे डम्पिंग ग्राउंड हटवण्यात यावे यासाठी शहरामध्ये अनेक आंदोलने देखील झाले आहेत. आता हे बेकायदेशीर डम्पिंग काढण्यासाठी सोमवारी संत प्रभाराम मंदिर उल्हासनगर -५ मध्ये एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या सर्व सदस्यांनी नव्याने गठीत केलेल्या समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी साई हिरालालजी यांच्यावर सोपवली असल्याची माहिती शशिकांत दायमा यांनी दिली आहे.
नव्याने गठीत समितीच्या सदस्यांमध्ये सर्वश्री प्रकाश गोविंदराम लुंड(पिकी), मनीष नारा, राजकुमार कुकरेजा, राजेश चांगलानी, विजय वाधवा, मनीष ठाकूर, रॉकी शर्मा, नरेश आहुजा, निल शर्मा, जैकी सुखेजा आणि शशिकांत दायमा यांचा समावेश असून त्यांनी सर्वसहमतीने बेकादेशीर डम्पिंग ग्राउंड काढण्याची मागणी तसेच मृत प्राण्यांना डम्पिंग ग्राउंड मध्ये न फेकण्याबाबत आणि त्यांचा सन्मानपूर्वक अंतिम संस्कार करण्यासाठी शवदाहिनीची मागणी केली. तसेच धूर आणि वास यासंबंधी समस्या सोडवण्यासाठी उपाययोजनांवर अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना या प्रदूषणाचे जबाबदार समजून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ही या बैठकीत करण्यात आली.





























