उल्हासनगर दि.२ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगरातील कॅम्प -५ मधील तानाजी नगर परिसरात मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास दहा ते बारा जणांच्या सशस्त्र टोळीने अचानक रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर हल्ला चढवून तोडफोड केली. या हल्ल्यात ४ मोटरसायकली, २ रिक्षा, २ टेम्पोसह ८ ते १० वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या तर पेट्रोल टाक्यांनी लक्ष करण्यात आले. या तोडफोडीमुळे परिसरात भीतीचे व दहशतीचे वातावरण पसरले आहे.

या घटनेबाबत हिललाईन पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी त्या ठिकाणी धाव घेऊन तोडफोड करण्यात आलेल्या वाहनांचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. घटना घडलेल्या ठिकाणावरील नागरिकांनी सांगितले ८ ते १० जणांची टोळी रात्री बाराच्या सुमारास हातात तलवार व कोयते घेऊन आले होते. पण ते त्या ठिकाणाहून पळून गेले. त्यानंतर पुन्हा साडेतीनच्या सुमारास परत येऊन रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक वाहनांची तोडफोड केली.

गाडीच्या काचा फोडून व पेट्रोलच्या टाक्या ही फोडण्यात आल्या. त्यांनी त्या परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले. अशा गुन्हेगारावर पोलिसांची वचक न राहिल्याने ते दहशतीचे वातावरण निर्माण करू लागले आहेत. पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त व हिल लाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी यांनी त्वरित या टोळीचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. सशस्त्र टोळीने केलेल्या या तोडफोडीमुळे वाहनधारकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.. वेळीच पोलिसांनी या गुन्हेगारांवर कारवाई केली नाही तर असे प्रकार नेहमीच घडत राहतील असेही नागरिकांचे म्हणणे आहे.






























