अंबरनाथ दि. ७: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) अंबरनाथ शहर अध्यक्षपदाची धुरा सांभाळणारे सदाशिव पाटील यांनी मंगळवारी ७ ऑक्टोबर रोजी अधिकृतरित्या पक्ष त्याग करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) पक्षात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी खासदार आनंद परांजपे आणि अन्य प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत यांनी प्रवेश केला. विशेष म्हणजे, प्रवेशाच्या काही वेळातच प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पाटील यांची अंबरनाथ शहर अध्यक्षपदी तातडीने नियुक्ती केली आहे.

मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. सदाशिव पाटील यांनी प्रवेश केला यावेळी त्यांच्यासोबत अंबरनाथचे माजी नगरसेवक सचिन पाटील, महिला आघाडी अध्यक्ष पूनम शेलार यांच्यासह अनेक सहकाऱ्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रवेशानंतर लगेचच खासदार सुनील तटकरे यांनी सदाशिव पाटील यांना अंबरनाथ शहर अध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र सुपूर्द केले. या पत्रात तटकरे यांनी म्हटले आहे की, “आपली महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अंबरनाथ शहर ‘अध्यक्ष’ पदी नियुक्ती करण्यात येत आहे. तरी पक्षाच्या वाढीसाठी व पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपले सहकार्य राहील, असा मला विश्वास आहे.” तटकरे यांनी पाटील यांच्या निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सदाशिव पाटील यांना पुन्हा एकदा अंबरनाथ शहरात पक्षाचे संघटन मजबूत करण्याची आणि पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्याची महत्त्वाची जबाबदारी पक्षाकडून देण्यात आली आहे. पाटील यांच्या या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) अंबरनाथमधील संघटनेला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.





























