उल्हासनगर दि. ९ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगरातील म्हारळ गावातील खदान परिसरात महावितरणमध्ये कंत्राटी वायरमन म्हणून कार्यरत असलेल्या दीपक शेळके यांचा वीज दुरुस्तीचे काम करताना शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच हा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला असून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कुटुंबीयांना न्याय व नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खदान परिसरात वीजपुरवठा खंडित झाल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटी वायरमन दीपक शेळके यांना दुरुस्तीच्या कामासाठी घटनास्थळी पाठवले होते. नातेवाईकांच्या आरोपानुसार, त्यांना कोणत्याही अन्य कर्मचाऱ्याची साथ न देता एकट्यालाच कामासाठी पाठविण्यात आले. दीपक हे विद्युत खांबावर चढून दुरुस्तीचे काम करत असताना त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला आणि ते थेट खाली कोसळले.घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोन करून माहिती दिली. मात्र, माहिती देऊनही कोणताही अधिकारी घटनास्थळी पोहोचला नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तसेच दीपक यांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळाले नसल्याने त्यांचा जीव गेला, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे. गंभीर अवस्थेत त्यांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
नातेवाईकांनी सांगितले की, दीपक शेळके यांना अनेकदा रात्री-अपरात्री वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तातडीने कामासाठी बोलावले जात असे. मात्र, कंत्राटी कर्मचारी असूनही त्यांच्यासोबत कायमस्वरूपी वायरमन किंवा अन्य कर्मचारी पाठविण्यात येत नव्हते. असा आरोपही त्यांनी केला आहे. याशिवाय, दीपक यांचा मृतदेह रुग्णालयात असतानाही महावितरणचा एकही वरिष्ठ अधिकारी भेटण्यासाठी किंवा कुटुंबीयांची विचारपूस करण्यासाठी आला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी काही काळ मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. “जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही,” अशी भूमिका त्यांनी घेतली.मृताच्या कुटुंबीयांनी संबंधित महावितरण अधिकाऱ्यांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची तसेच दीपक शेळके यांच्या कुटुंबाला योग्य आर्थिक नुकसानभरपाई व शासकीय मदत देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाबाबत महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.





























