उल्हासनगर दि २४ ( प्रमोद दळवी ) : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ( उबाठा )पक्षाचे एकनिष्ठ नेता म्हणून उल्हासनगरत ओळखले जाणारे जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यापासून उल्हासनगर शहरात सुरू होती. अखेर त्यांनी उबाठाला अखेरचा जय महाराष्ट्र करीत भाजपात प्रवेश केला . निवडणुकीच्या दरम्यान धनंजय बोडारे यांनी भाजपात प्रवेश केल्याने उद्धव ठाकरे गटाला एक मोठा झटका लागला आहे.

उल्हासनगर महापालिकेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण पक्षप्रवेश भारतीय जनता पार्टीचे नेते प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. उल्हासनगर महापालिकेचे सभागृह नेते, माजी उपमहापौर, व उबाठा गटाचे जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांनी , माजी नगरसेविका वसुधाताई बोडारे , व टीम ओमी कलानी यांच्या गटातील नाना बिराडे या सर्वांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपा मध्ये जाहीर प्रवेश केला. उल्हासनगर महापालिकेच्या दृष्टीने उबाठा गटातून आणि ओमी कलानी यांच्या गटातून या सर्वांचा भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश झाल्याने त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.

भाजपात प्रवेश करण्याच्या दृष्टिकोनातून धनंजय बोडारे यांनी सांगितले संपूर्ण देशामध्ये विकासाचे वारे चालू आहे. विकासाचं वारं, विकासाची गंगा, ती महाराष्ट्र मध्ये सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये आणि भारतीय जनता पार्टीचे नेते प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये चालू आहे, वाहते आहे, एक विकासाकडे चाललेला देश विकासाकडे चाललेला राज्य आणि अशाच पद्धतीचा विकास या उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये व्हावा या अपेक्षाने ज्या लोकांच्या अपेक्षा राज्य शासनाकडून असतात, महापालिका प्रशासनाकडून असतात, शासनाकडून असतात, त्या पूर्ण करण्याच्या एकमेव उद्देशाने मी आज माझ्या परिवारातील नगरसेवकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. मला फार मनापासून आनंद होतोय. खऱ्या अर्थाने नक्कीच आम्ही सर्व मिळून उल्हासनगर वासियांना अपेक्षित असलेलं शहर जे बऱ्याच वर्षापासून नुसता फक्त नाव आहे की सिंगापूर करू, नक्कीच ते चांगलं तरी करू, एवढी अपेक्षा आणि आशा ज्या उल्हासनगर वासियांच्या त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू एवढं वचन मी उल्हासनगर वासियांना देतो असे धनंजय बोडारे यांनी सांगितले.





























