उल्हासनगर, दि. १० ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगरातील अमराठी व हिंदीभाषिक रिक्षाचालक आणि रिक्षामालकांना मराठी भाषा सहजपणे शिकता यावी तसेच प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधता यावा, या उद्देशाने रमाकांत चव्हाण रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष हरजिंदरसिंह (विक्की) भुल्लर यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा प्रशिक्षण उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. ३० जून ते १० जुलै २०२६ या कालावधीत पार पडलेल्या या प्रशिक्षणात ६५० हून अधिक रिक्षाचालक आणि रिक्षामालकांनी सहभाग नोंदवून प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले.

हा उपक्रम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या प्रेरणेने तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. प्रशिक्षणादरम्यान प्रा. डॉ. प्रकाश माळी (प्रशिक्षण समन्वयक), श्री. प्रल्हाद कोलते (केंद्र प्रमुख), प्रमोद पांडेय, निखिल पाटील तसेच प्रशिक्षक श्री. ईश्वर सपकाळे, श्री. प्रमोद पाटील, श्री. राहुल जैन आणि डॉ. गोविंद गायकवाड यांनी मराठी भाषेचे महत्त्व, दैनंदिन व्यवहारातील वापर, प्रवाशांशी प्रभावी संवाद साधण्याची पद्धत तसेच प्राथमिक मराठी संभाषणाचे प्रशिक्षण दिले.उपस्थित रिक्षाचालकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत नियमितपणे प्रशिक्षण पूर्ण केले.

प्रशिक्षणादरम्यान सहभागी रिक्षाचालकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. अनेक चालकांनी मराठी भाषा शिकण्याची इच्छा व्यक्त करत नियमित उपस्थिती लावली. या उपक्रमामुळे प्रवाशांशी संवाद साधताना येणाऱ्या भाषेच्या अडचणी मोठ्या प्रमाणात दूर होतील, असा विश्वासही सहभागी चालकांनी व्यक्त केला. आयोजकांच्या माहितीनुसार, प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या सर्व सहभागी रिक्षाचालकांना महाराष्ट्र शासनाकडून अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. उपक्रमाचे प्रमुख प्रेरणास्थान हरजिंदरसिंह (विक्की) भुल्लर यांनी सांगितले की, मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा असून राज्यातील प्रत्येक नागरिकाला आणि सेवा क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. रिक्षाचालक आणि प्रवासी यांच्यातील संवाद अधिक सुलभ, सुसंवादी आणि आत्मीयतेने व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला असून भविष्यातही अशा प्रकारचे प्रशिक्षण उपक्रम सुरू ठेवण्याचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“चला मराठी बोलूया… आओ मराठी बोलेंगे!” या घोषवाक्यासह राबविण्यात आलेल्या या उपक्रमाने उल्हासनगरात मराठी भाषा संवर्धनाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. मराठी भाषेचा प्रसार, सामाजिक सलोखा आणि नागरिकाभिमुख सेवा अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असून सहभागी रिक्षाचालकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.





























