उल्हासनगर दि. ७ : बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसारासाठी कार्यरत असलेल्या धम्मकाया मिशन (एक विश्व बौद्ध मिशन) या संस्थेतर्फे नुकताच उल्हासनगर-४ येथील महास्थवीर चंद्रमणी बुद्ध विहार, आदर्श विकास मंडळ येथे एक दिवसीय उपासिका संमेलनाचे भव्य आयोजन करण्यात आले होते.
या संमेलनाचा मुख्य उद्देश प्रशिक्षित उपासिका संघाचे निर्माण करणे आणि समाजात बौद्ध मूल्यांची पुनर्स्थापना करणे हा होता. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात प्रमुख पाहुण्या उपासिका सुजाताई गवई यांनी ‘भगवान बुद्धांचे दहा बल’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. त्यानंतर उपासिका कमिटीच्या संयोजिका माधुरीताई भालेराव यांनी ‘बौद्ध संस्कृतीचे पुनरुज्जीवन’ या विषयावर आपले विचार प्रभावीपणे मांडले. धम्मकाया मिशनचे संस्थापक उपासक प्रवीण पंडित यांनी ‘महाबोधी महाविहार आंदोलनाची पुढील दिशा’ यासंदर्भात माहिती दिली.

भोजनानंतरच्या दुसऱ्या सत्रात, उपासिका वैशाली महाजन यांनी ‘भगवान बुद्धांनी स्थापन केलेला भिक्खुनी संघ: एक महान क्रांती’ याविषयी सविस्तर माहिती दिली. नंतर मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष उपासक भीमराव घनसावंत यांनी ‘प्रशिक्षित उपासिका संघाची आवश्यकता’ या विषयावर उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
तिसऱ्या व शेवटच्या सत्रात, उपासिका अर्चना अहिरे यांनी भिक्खुनी पटाचारा थेरी यांचा धम्म प्रवास याबाबत तर उपासिका शीतल सावळे यांनी ‘श्रद्धा भावना’, उपासिका माधुरी घोडके यांनी ‘समाजाला मैत्री भावनेची आवश्यकता’ तसेच उपासिका मंगला जाधव यांनी भिक्खुनी किस्सा गौतमी यांच्याबद्दल मोलाची माहिती दिली. या संमेलनास अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. आदर्श विकास मंडळाचे अध्यक्ष पोपट निकम, वैशालीताई वाघ, सचिन गायकवाड, दत्ता गवई, किरण देवी रामसिंग, उषाताई जाधव, प्रवीण गायकवाड, संतोष वाघ, सिद्धार्थ राजवर्धन, तसेच धम्मकाया मिशनचे महाराष्ट्र अध्यक्ष सचिन गायकवाड हे विशेष उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजन ठाणे जिल्हा अध्यक्ष उपासिका अर्चना अहिरे यांचे केले होते तर विशेष योगदान त्यांना सचिव शीतल सावळे, कमिटी सदस्य माधुरी घोडके, रायगड जिल्हा अध्यक्ष अनिता वाटुंबरे, राज्य कमिटी सदस्य मंगला जाधव आणि प्रज्ञा पवार यांचे मोलाचे सहकार्याने लाभले.ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज सावळे व जिल्हा कमिटी सदस्य अर्जुन अहिरे यांनीही संयोजनात सक्रिय सहभाग नोंदविला. नाशिक, रायगड व मुंबई जिल्ह्यांतून आलेल्या उपासिका संघांनी संमेलनात सहभाग घेऊन कार्यक्रमाची धम्ममय शोभा वाढवली. संपूर्ण कार्यक्रम धम्म कृतज्ञतेच्या भावनेने भारलेला होता आणि उपस्थित सर्व उपासिकांसाठी तो एक प्रेरणादायी व स्फूर्तिदायक अनुभव ठरला.





























