उल्हासनगर दि. २७ ( प्रमोद दळवी ) : कल्याण-बदलापूर मार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी उल्हासनगर वाहतूक उपविभागाने सोमवारी विशेष धडक कारवाई मोहीम राबविली. या मोहिमेत सार्वजनिक रस्त्यावर बेकायदेशीरपणे वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या जुनी वाहने विक्रेते, दुचाकी व चारचाकी गॅरेज तसेच कार डेकोरेटर्स यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात आली.

ही कारवाई उल्हासनगर वाहतूक उपविभागाचे पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक गोरख चौधरी,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ काळे, पोलीस हवालदार नाना आव्हाड, गोरक्षनाथ दराडे, विशाल गोरले आणि प्रशांत परदेशी यांच्या पथकाने सहभाग घेतला.

शांतीनगर ते डर्बी चौक या कल्याण-बदलापूर रोडवरील परिसरात दुकानांसमोर विक्रीसाठी उभी केलेली वाहने, दुरुस्तीसाठी सार्वजनिक रस्त्यावर ठेवण्यात आलेली वाहने तसेच सजावटीच्या कामासाठी दुकानाबाहेर उभी करण्यात आलेली वाहने यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या अशा वाहनांवर मोटार वाहन कायदा कलम १२२/१७७ अंतर्गत कारवाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण १०५ प्रकरणे नोंदविण्यात आली असून संबंधितांकडून १,१२,३०० इतका दंड वसूल करण्यात आला. याबाबत पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत यांनी सांगितले की, कल्याण-बदलापूर रोड हा अत्यंत वर्दळीचा आणि महत्त्वाचा मार्ग असून सार्वजनिक रस्त्यावर बेकायदेशीर पार्किंगमुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होतो.
त्यामुळे अशा प्रकारच्या उल्लंघनांविरोधात यापुढेही नियमितपणे धडक कारवाई सुरू ठेवण्यात येईल. नागरिकांनी तसेच व्यावसायिकांनी सार्वजनिक रस्त्याचा वापर पार्किंगसाठी न करता वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. वाहतूक पोलिसांच्या या कारवाईमुळे रस्त्यावरील अतिक्रमणासह बेकायदेशीर पार्किंगला आळा बसण्यास मदत होणार असून, वाहतूक अधिक सुरळीत करण्याच्या दृष्टीने ही मोहीम सातत्याने सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.





























