उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी ) : केंद्र सरकारच्या अमृत अभियानांतर्गत उल्हासनगर शहरासाठी २११.०६ कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पामुळे शहरातील लाखो नागरिकांना भविष्यात नियमित, मुबलक आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार असल्याची माहिती महापौर अश्विनी निकम यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यावेळी शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख अरुण अशान, आमदार कुमार आयलानी, माजी आमदार पप्पू कलानी, महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, कमलेश निकम, स्थायी समिती सभापती कलवंत सिंग सोहता, भाजप व शिंदेसेनेचे नगरसेवक तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

उल्हासनगर शहरातून बारमाही वाहणारी उल्हास नदी असूनही महापालिकेची स्वतंत्र पाणीपुरवठा योजना आजपर्यंत अस्तित्वात नव्हती. त्यामुळे महापालिकेला एमआयडीसीकडून पाणी खरेदी करून नागरिकांना पुरवठा करावा लागत होता. शहराला दररोज सुमारे १४० एमएलडी पाणीपुरवठा होत असला तरी वाढती लोकसंख्या आणि अपुऱ्या वितरण व्यवस्थेमुळे अनेक भागांमध्ये पाणीटंचाई कायम होती.महापालिकेची स्वतःची पाणी स्रोत निर्माण करण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे, महापालिका आयुक्त अश्विनी निकम, महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी अमृत योजने अंतर्गत शासनाकडे पाठपुरावा केला होता. अखेर त्याला यश येऊन २११.०६ कोटीच्या पाणीपुरवठा प्रकल्प योजनेला मंजूर मिळाली आहे.
याबाबत माहिती देताना शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी सांगितले की, शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन खासदार श्रीकांत शिंदे यांनी केंद्र व राज्य सरकारकडे सातत्याने प्रभावी पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे हा महत्त्वाचा प्रकल्प मंजूर झाला आहे.आमदार कुमार आयलानी यांनीही या प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या पाठपुराव्याची कागदपत्रे पत्रकारांसमोर सादर केली. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष व गटनेते राजेश वधारिया यांनी महापालिकेची स्वतःची पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्यानंतर पाणी खरेदीवरील खर्च कमी होईल आणि भविष्यात पाण्याच्या दरातही सुमारे निम्मी कपात होण्याची शक्यता असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी खासदार श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सुनेत्रा पवार यांचे प्रकल्प मंजुरीसाठी आभार व्यक्त केले.
प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये
सुमारे एका वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन असलेल्या या प्रकल्पामध्ये जलस्रोत व उपसा यंत्रणा, इंटेक वेल, जॅकवेल, अत्याधुनिक पंप हाऊस, जलशुद्धीकरण केंद्र, रॉ-वॉटर रायझिंग मेन तसेच संपूर्ण शहरासाठी नवीन जलवितरण व्यवस्था उभारण्यात येणार आहे. याशिवाय सौरऊर्जेचा वापर करून प्रकल्प अधिक ऊर्जा कार्यक्षम करण्यात येणार असून महापालिकेच्या वीज खर्चातही बचत होणार आहे.
नागरिकांना होणारे फायदे
प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर उल्हासनगरमधील लाखो नागरिकांना पुरेशा दाबाने नियमित आणि शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होईल. जुन्या व गळतीग्रस्त जलवाहिन्यांच्या जागी नवीन पाइपलाइन टाकण्यात येणार असल्याने पाणीगळती मोठ्या प्रमाणावर कमी होईल. स्वतंत्र पाणीस्रोत उपलब्ध झाल्यामुळे भविष्यातील वाढत्या लोकसंख्येची पाण्याची गरजही पूर्ण होण्यास मदत होणार आहे. तसेच पाणीपुरवठा अधिक सक्षम, शाश्वत आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारा करण्याच्या दिशेने हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.





























