( प्रमोद दळवी )
उल्हासनगर दि.२९ : वडोळगाव पुलासमोरील प्रलंबित रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यापासून रखडले आहे. या रस्त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय किरकोळ अपघाताच्या घटनाही त्या ठिकाणी घडत असतात. पुलासमोरील प्रलंबित रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात यावे अशी मागणी गावकऱ्यांसह, समाजसेवक शिवाजी रगडे यांनी पालिकेला निवेदनाद्वारे केली आहे. जर पावसाळ्यापूर्वी हे काम झाले नाही तर गावकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असाही इशारा शिवाजी रगडे यांनी दिला आहे.

गेल्या काही महिन्यापासून वडोळगाव पुलासमोरील रस्त्याचे काम प्रलंबित आहे. हे काम पालिकेने पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे याकरिता वडोळगाव मधील मंडळाच्या प्रतिनिधीसह, गजानन म्हात्रे ,शंकर जाधव, अशोक म्हात्रे, रविंद्र केणे, अतिश जाधव, शरद म्हात्रे , मनोज म्हात्रे ,राजेंद्र जाधव समाजसेवक शिवाजी रगडे यांनी आज पालिकेत धडक दिली. त्यावेळी पालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या आदेशाने उपायुक्त सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विशाखा मोटघरे यांच्या दालनात कार्यकारी अभियंता संदीप जाधव यांच्यासह बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पावसाळ्यापूर्वी सदर प्रलंबित कटिंग पूर्ण करून रस्त्याचे काम पूर्ण व्हावे यासंदर्भात चर्चा झाली. त्यावेळी उपआयुक्त विशाखा मोटघरे यांनी गावकऱ्यांच्या या मागण्या मान्य करीत वार्ड ऑफिसर यांना पत्र देऊन आठवड्याभरात कार्यवाही करण्याचे आदेश दिले. सध्या सदर रस्ता सरळ करून नागरिकांना चालण्यास कुठलाही अडथळा येणार नाही यासाठी दोन दिवसात काम सुरू होईल असे कार्यकारी अभियंता संदीप जाधव यांच्याकडून सांगण्यात आले. त्यावेळी सर्व गावकऱ्यांनी एकच मागणी केली आहे रस्ता एकदाच होईल ठरल्याप्रमाणे रस्ता व्हावा प्रशासनाने आज मान्य केलेले आहे. अपेक्षा आहे की मागणी अनुसार पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण होईल. पण या वेळेस विलंब झाला तर गावकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील गावकऱ्यांसह समाजसेवक शिवाजी रगडे यांनी पालिकेला दिला आहे





























