बदलापूर दि. २५ ( प्रमोद दळवी ) : आषाढी एकादशीच्या निमित्ताने बदलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अन्न व प्रशासन विभागाचे महाराष्ट्र आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या कार्याचा अनोख्या पद्धतीने गौरव करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश देशमुख यांच्या पुढाकारातून मुंडे यांच्या सुमारे ३५ फूट उंच कटआउटला क्रेनच्या सहाय्याने दुग्धाभिषेक व पुष्पवृष्टी करण्यात आली. या उपक्रमाने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

यावेळी बोलताना अविनाश देशमुख यांनी तुकाराम मुंडे यांच्या प्रामाणिक, धाडसी आणि पारदर्शक प्रशासनशैलीचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, अन्न व प्रशासन विभागाच्या माध्यमातून राज्यभर दूध, दही, दुग्धजन्य पदार्थ, हॉटेल्स, बेकरी, डेअरी तसेच इतर खाद्य व्यवसायांवर प्रभावी कारवाई सुरू आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित नियमांची काटेकोर अंमलबजावणी होत असून, अन्नसुरक्षेला प्राधान्य मिळत आहे.
देशमुख म्हणाले की, राज्यातील अनेक हॉटेल्स, बेकरी, डेअरी आणि दूध विक्रेत्यांमध्ये नियमांचे पालन करण्याबाबत जागरूकता वाढली आहे. तसेच, बंदी असतानाही राज्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या गुटखा आणि मावा विक्रीवरही प्रशासनाने कठोर कारवाईचा बडगा उगारला असून, त्यावर मोठ्या प्रमाणात अंकुश बसत असल्याचे दिसून येत आहे. “तुकाराम मुंडे यांच्यासारखे कर्तव्यदक्ष, निर्भीड आणि प्रामाणिक अधिकारी महाराष्ट्रातील प्रत्येक शासकीय विभागात असतील, तर राज्याच्या प्रशासनाचा चेहरामोहराच बदलून जाईल,” असा विश्वासही अविनाश देशमुख यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास ज्येष्ठ समाजसेवक नाना देशमुख, अंबरनाथ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष समीर खान, अशोक गजरमल, पप्पू काळे, जिल्हा सरचिटणीस माणिक कारंडे, जिल्हा सचिव राजेश वानखेडे, शहर उपाध्यक्ष वंदना भगत, मनीषा पोळ, नगेश बरें, हेमंत पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





























