उल्हासनगर दि. २३ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या विविध नागरी समस्या सोडविणे तसेच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सामाजिक संघटना, समाजसेवक आणि नागरिक प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक विरोधी पक्षनेत्या अंजली चंद्रकांत साळवे यांच्या दालनात उत्साहात पार पडली.
बैठकीच्या प्रारंभी नुकत्याच दिवंगत झालेल्या स्वर्गीय श्रीमती सरिता खानचंदानी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर रोहित साळवे यांनी उपस्थितांचे स्वागत करून बैठकीला सुरुवात केली. या बैठकीस उल्हासनगर शहरातील विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, समाजसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांच्या दैनंदिन अडचणी, महापालिका प्रशासनाचे कार्य आणि शहर विकासाशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.

बैठकीत विशेषतः उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून दरमहा आयोजित करण्यात येणारा लोकशाही दिन आणि जनता दरबार नियमितपणे भरविला जात नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्यांचे तातडीने निराकरण व्हावे, यासाठी हे उपक्रम नियमितपणे आयोजित करण्याची मागणी करण्यात आली. तसेच महापालिकेतील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून कामकाजात होत असलेल्या दुर्लक्षाबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली. प्रशासन अधिक जबाबदारीने आणि पारदर्शकपणे कार्य करावे, अशी मागणी उपस्थितांनी केली.
बैठकीत वृक्ष कमिटी अधिक प्रभावीपणे कार्यरत करण्याबाबत, पर्यावरण संरक्षण आणि वालधूनी नदी स्वच्छता व संवर्धनासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. शहरातील पर्यावरण संतुलन राखण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याचे आवाहन करण्यात आले. याशिवाय, महापालिकेच्या कर पावत्या वाटपाचे काम करणाऱ्या कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नसल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. संबंधित कंत्राटदारांवर कारवाई करून कर्मचाऱ्यांना तातडीने प्रलंबित वेतन देण्याची मागणी करण्यात आली.
बैठकीत शासनाच्या नियमानुसार स्वीकृत नगरसेवकांची तातडीने नियुक्ती, डम्पिंग ग्राउंडवर जनावरांच्या शवदाहिनीसाठी स्वतंत्र सुविधा उभारणे, घनकचऱ्याचे शास्त्रोक्त वर्गीकरण, शहरातील स्मार्ट मीटर संदर्भातील नागरिकांच्या तक्रारी तसेच भ्रष्टाचाराच्या आरोपांना सामोरे जाणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून आवश्यकतेनुसार बदली अथवा सेवेतून निष्कासन करण्याबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीच्या शेवटी शहराच्या विकासासाठी सर्व सामाजिक संघटना एकत्रितपणे कार्यरत राहतील तसेच नागरिकांच्या प्रश्नांसाठी महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, असा निर्धार व्यक्त करण्यात आला. उपस्थितांनी शहरहितासाठी समन्वयाने काम करण्याचा संकल्प व्यक्त करत बैठकीची सांगता करण्यात आली.





























