ठाणे दि.७ : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ज्ञानगंगा कॉलेज ऑफ फार्मसीच्या रोटरॅक्ट क्लबतर्फे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमात महाविद्यालयाचे पदाधिकारी, प्राध्यापकवृंद व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाची सुरुवात रोटरॅक्ट समन्वयक प्राध्यापिका सौ. नीलम जगदाळे मॅडम यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व विषद करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. डी. पाटील सर, रोटरॅक्ट सदस्य श्री. राजीव दिवाण सर, जनसंपर्क अधिकारी श्री. अनिल आठवले सर, रोटरॅक्ट समन्वयक श्री. हेमंत ढाकणे सर तसेच प्राचार्य डॉ. भारत टेकाडे सर उपस्थित होते. यानंतर कार्यक्रमाचे सूत्र प्रकल्प प्रमुख श्री. निखिल जुवार्गी यांनी हाती घेतले. त्यांनी वृक्षारोपणाचे पर्यावरणीय महत्त्व सांगत विद्यार्थ्यांनी लावलेल्या रोपांचे संगोपन व संरक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन केले.
वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. डी. पाटील सर यांच्या हस्ते शेवग्याचे रोप लावून करण्यात आला. यावेळी त्यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत अधिकाधिक वृक्ष लागवड करण्याची आवश्यकता व्यक्त केली. त्यानंतर अनिल आठवले सर, राजीव दिवाण सर आणि डॉ. भारत टेकाडे सर यांनी वृक्षारोपण केले. त्यानंतर प्राध्यापकवृंद व विद्यार्थ्यांनी विविध रोपे लावून पर्यावरण संरक्षणासाठी आपली बांधिलकी व्यक्त केली. कार्यक्रमानंतर सर्व मान्यवर, शिक्षक व विद्यार्थ्यांनी समूह छायाचित्रे काढून या उपक्रमाची आठवण जपली. शेवटी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. हा उपक्रम पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा ठरला असून विद्यार्थ्यांमध्ये वृक्षसंवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करण्यास मोलाची मदत झाली.





























