उल्हासनगर दि २९ ( प्रमोद दळवी ) : आजवर उल्हासनगर शहरात नळाद्वारे गढूळ पाणी येणे, दगडी येणे, बारीक आळ्या येणे असे प्रकार घडले होते. पण आता चक्क पिण्याच्या पाण्याच्या नळा मधून कोंबड्यांचे पंख निघाल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आशा होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. नळाद्वारे कोंबड्याचा पंख निघाल्याची ही खळबळजनक घटना उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर -२ खेमानी परिसरातील रमाबाई आंबेडकर नगरात घडली आहे. या घटनेमुळे त्या परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून त्वरित हा दूषित पाणीपुरवठा थांबवावा आणि आमच्या परिसरात शुद्ध पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी महिला वर्गांनी केली आहे.

उल्हासनगरातील कॅम्प नंबर – २ खेमानी परिसरातील रमाबाई आंबेडकर नगरात राहणाऱ्या सोनवणे कुटुंबाच्या घरी व परिसरात गेल्या अनेक दिवसापासून नळाद्वारे पिण्याचा पाण्याचा दूषित पाणीपुरवठा होत आहे. आता तर सोनवणे यांच्या घरामध्ये असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या नळामधून चक्क कोंबड्याचे पंख निघाले. या आधी देखील दोन वेळा त्यांच्याकडे असा प्रकार घडला होता. मात्र त्यावेळी सोनवणे यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र पुन्हा एकदा त्यांच्या घरातील नळांमधून कोंबड्याचे पंख निघाल्याने त्यांनी पुरावा म्हणून आपल्या मोबाईल मध्ये याचे चित्रीकरण केलं. शिवाय गेल्या काही दिवसापासून पिण्याच्या पाण्याला मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे त्या परिसरात नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. महापालिका प्रशासन आणि महापौर अश्विनी निकम यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन ही समस्या सोडवावी व त्वरित शुद्ध पाणीपुरवठा त्या परिसरात करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

सुरुवातीला अर्धा तास नळातून चक्क मातीचे पाणी येतो असे देखील सोनवणे यांनी सांगितले तसेच परिसरात सर्वांनाच या दूषित पाणीपुरवठाचा सामना करावा लागत आहे. आशा या दूषित पाणी पुरवठ्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही असे देखील नागरिकांनी सांगितले. याशिवाय परिसरातील महिलांनी सांगितले की याबाबत आम्ही महापौर मॅडम यांना सांगितले आहे. नळाद्वारे येणारा पाणी हे पिण्यालायक नसून त्यातून खडे माती व कोंबड्याचे पंख देखील आता निघत आहेत. त्यामुळे लवकरच लवकर या परिसरात शुद्ध पाणीपुरवठा करण्यात यावा. अन्यथा आम्हाला या पाण्यासाठी आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल असे देखील काही महिलांनी सांगितले. नळाद्वारे येणारा दुर्गंधीयुक्त पाणी पिण्याची ही आमची इच्छा होत नाहीये असे देखील नागरिक सांगत आहेत. जर नळातून पिण्याच्या पाण्यातून निघणाऱ्या कोंबड्याच्या पंखाचा व्हिडिओ केला नसता तर कोणालाच खरं वाटलं नसतं. पण व्हिडिओ केल्यामुळे दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा प्रकार उघडकीस आला असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.

पाणीपुरवठा विभागाने या समस्याकडे तातडीने लक्ष द्यावे असे देखील आदेश महापौर अश्विनी निकम यांनी दिले आहेत. पिण्याच्या पाण्यामधून पहिल्यांदाच कोंबड्याचे पंख निघाल्याची ही पहिली घटना असावी त्यामुळे उल्हासनगर महापालिकेच्या प्रशासनाने याचे गांभीर्य ओळखून तात्काळ त्या ठिकाणी शुद्ध पाणीपुरवठा कसा करता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे





























