उल्हासनगर दि.२४ ( प्रमोद दळवी ) : भाजपचे नगरसेवक म्हणून उल्हासनगर महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक १८ मधून निवडून आलेले तसेच अंबरनाथ विधानसभा क्षेत्रात भाजपकडून आमदारकी लढलेले, वं त्या नंतर पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे( उबाठा ) मध्ये प्रवेश करून उबाठा गटाकडून अंबरनाथ विधानसभा क्षेत्रात आमदारकी लढलेले राजेश वानखेडे यांनी बुधवारी त्यांच्या निवासस्थानी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करून पुन्हा घर वापसी केली आहे.

बुधवारी विविध राजकीय पक्षांचे अनेक नेते आणि कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात सामील झाले. ज्यामुळे संघटना बळकट झाली. उबाठा गटाचे राजेश वानखेडे यांच्या निवासस्थानी हा प्रवेश समारंभ पार पडला. जिथे मोठ्या संख्येने समर्थकही उपस्थित होते. भाजपमध्ये सामील झालेल्यांमध्ये राजेश वानखेडे, मनोज शेलार, भाऊ म्हात्रे, प्रधान पाटील आणि इतर अनेक कार्यकर्ते होते. भाजपच्या धोरणांवर आणि नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांनी पक्षासोबत पुढे जाण्याचे वचन दिले. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया, आमदार कुमार आयलानी, निवडणूक अध्यक्ष प्रदीप रामचंदानी आदी त्यावेळी उपस्थित होते. नवीन सदस्यांचे स्वागत करताना नेत्यांनी सांगितले की, त्यांच्या आगमनामुळे आगामी निवडणुकीत पक्ष निश्चितच बळकट होईल आणि संघटनेत नवी ऊर्जा निर्माण होईल. राजेश वानखेडे यांची भाजपात घर वापसी झाल्यामुळे उल्हासनगरातील प्रभाग क्रमांक १८ मध्ये मोठा कायापालट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

एकाच दिवशी भाजपामध्ये उल्हासनगरतील दोन मोठ्या नेत्यांनी इंट्री केल्याने उल्हासनगर शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठे धक्के बसले आहेत. सकाळी उबाठाचे जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे व संध्याकाळी राजेश वानखेडे यांनी भाजपात प्रवेश केला . यांच्यासोबतच युवासेना जिल्हा प्रमुख भाऊ म्हात्रे, मनसेचे मनोज शेलार आणि इतर अनेक जणांनी भाजपामध्ये मोठ्या संख्येने प्रवेश केला.





























