उल्हासनगर दि १७ ( प्रमोद दळवी ) : आजच्या संगणक युगात विद्यार्थ्यांसाठी जीसीसी टीबीसी हा संगणक कोर्स शासकीय नोकरी मिळवण्यासाठी महत्त्वाचा आहे. हा कोर्स करून अनेक विद्यार्थ्यांनी शासकीय नोकरी देखील प्राप्त केली आहे. त्यामुळे हा जीसीसी टीबीसी संगणक कोर्स प्रत्येक विद्यार्थ्यांनी करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन ठाणे डिस्ट्रीक्ट कॉमर्स एज्युकेशनल इन्स्टिटयुट्स असोसिएशनचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अभिनय जोशी यांनी उल्हासनगरात सर्व शासन मान्यताप्राप्त संगणक टायपिंग इन्स्टिट्यूटच्या संस्थासालकांची आयोजित केलेल्या बैठकीच्या वेळी केले.
उल्हासनगर शहरात शासन मान्यताप्राप्त दहा कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट असून या इन्स्टिट्यूटचे प्राचार्य ( प्रिन्सिपल ) यांना जीसीसी टीबीसी या संगणक कोर्सबाबत काही महत्वपूर्ण सूचना व मार्गदर्शन करण्यासाठी कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर तालुक्यात तातडीची उल्हासनगर तालुका प्रतिनिधी नरेश पटेल यांच्या नीलम कमर्शियल इन्स्टिट्यूट मध्ये धी ठाणे डिस्ट्रीक्ट कॉमर्स एज्युकेशनल इन्स्टिटयुट्स असोसिएशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने बैठक आयोजित केली होती. या बैठकीत कल्याण-डोंबिवली व उल्हासनगरातील शासन मान्यताप्राप्त कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूटचे सर्व संस्थाचालक उपस्थित होते.

धी ठाणे डिस्ट्रीक्ट कॉमर्स एज्युकेशनल इन्स्टिटयुट्स असोसिएशनचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अभिनय बाळकृष्ण जोशी, जिल्हा प्रतिनिधी संतोष काशिनाथ झंजाड, कार्याध्यक्ष उमेश अनंत परुळेकर, सर चिटणीस/प्रसिद्धी प्रमुख, विनेश दत्तात्रय आगळे, खजिनदार तुषार गंगाधर भुतारे, उपखजिनदार राजन मिस्त्री यांनी ही बैठक आयोजित केली होती. या तातडीच्या बैठकीला , उल्हासनगर तालुका प्रतिनिधी नरेश भागुभाई पटेल (नीलम कमर्शियल इन्स्टिट्यूटचे प्राचार्य ) व उल्हासनगरातील चेतन कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट – प्रमोद दळवी (प्राचार्य),लक्ष्मी टायपिंग इन्स्टिट्यूट – प्रतीक्षा हरम (प्राचार्य) , निलेश टायपिंग इन्स्टिट्यूट – निलेश शिंपी (प्राचार्य), डांगे टायपिंग इन्स्टिट्यूट -विलास मस्के (प्रतिनिधी) स्वप्नील कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट – उत्तम निकम (प्राचार्य), एस. कुमार कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट – आयल सिंघानी (प्राचार्य) हे उपस्तीत होते.

या बैठकीत काही महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली त्यात विषय क्रमांक १): नुकताच MKCL या एका खाजगी संस्थेने MS-CIT सोबत CCTP हा खाजगी टायपिंग अभ्यासक्रम सुरू केला असून, त्याची परीक्षा महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (MSBTE) या शासन संस्थेकडून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. या कोर्सला मान्यता न मिळणेबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, महाराष्ट्र राज्य संघटना आणि ठाणे जिल्हा संघटना आपापल्या परीने प्रयत्न करीत असल्याचे उपस्थित सर्व संस्थाचालकांना सांगण्यात आले. विषय क्रमांक २): CCTP या कोर्सला मान्यता मिळाल्यास भविष्यात उद्भवणारे प्रश्न, व्यवसायाचे बदलणारे गणित, त्यातून निर्माण होणारी अनैसर्गिक स्पर्धा, संस्थाचालकांची जबाबदारी, आव्हाने, सामोरे जाव्या लागणाऱ्या समस्या आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थित संस्थाचालकांनी देखील याबाबत आपल्या प्रतिक्रिया मांडल्या. सर्व संस्थाचालकांनी सांघिक शक्ती दाखवत एकत्र येऊन लढा देण्याचे मान्य केले हि आपल्या जमेची बाजू मानता येईल. विषय क्रमांक ३): उल्हासनगर येथील एका टायपिंग इन्स्टिटयूट चालकाने आपली संस्था MKCL च्या एका MS-CIT चालविणाऱ्या खाजगी संस्थेस दिल्याची तक्रार उल्हासनगर येथील सर्व संस्थाचालकांनी एकत्र येत ठाणे जिल्हा संघटनेकडे दिली होती. याबाबतचे सर्व पुरावे त्यांनी संघटनेकडे सुपूर्द केले. या गंभीर प्रकाराबाबत शहानिशा करण्यासाठी दोन्ही संस्थाचालकांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु दुसरे खाजगी क्लासचालक उपस्थित होते. त्यांनी आपल्या क्लास बाहेरील बोर्डवर मान्यता नसतानाही GCC-TBC लिहीत असल्याचे व शुल्क कमी करून कोर्स विकत असल्याचे मान्य केले. त्यांना योग्य ती समज देऊन तात्काळ हा प्रकार बंद करावा अन्यथा संघटना पुढील कारवाई करत उल्हासनगर येथील सर्व संस्थाचालकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असे स्पष्ठपणे सांगण्यात आले. विषय क्रमांक ४): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या प्रत्रानुसार जिल्हा समन्वय समितीला पुढील प्रक्रियेसाठी अधिकचे अधिकार देण्यात आल्याचे सांगण्यात आले. नवी मान्यता, हस्तांतरण, स्थलांतर असे करताना आत्ता जिल्हा समन्वय समितीच्या अभिप्रायाशिवाय ठाणे जिल्हा परिषद, शिक्षण उपसंचालक आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद हि साखळी प्रक्रिया पुढे जाणार नसल्याचे सूचित करण्यात आले. याबाबत ठाणे शहरातील एका संस्थेचे काम याच गोष्टीमुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे येथे अडल्याचे सांगण्यात आले.
महाराष्ट्रात खूप जुन्या टायपिंग इन्स्टिट्यूट संस्था देखील आहेत. व या संस्था आजही मोठ्या थाटात सुरू आहेत. पण आज काही अशा खाजगी संस्था आहेत की ते विद्यार्थ्यांची दिशाभूल करून पैशा लाटण्याचा प्रयत्न करीत असतात. पण आपला हा जीसीसी टीबीसी कोर्स शासन मान्यताप्राप्त आहे. या कोर्सचे महत्व विद्यार्थ्यांना कळणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व संगणक संस्थाचालकांनी या कोर्स संदर्भात जनजागृती करणे गरजेचे आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे ( भाप्रसे ) यांनी जेव्हापासून पदभार हाती घेतला आहे. त्यांनी महाराष्ट्रातील सर्व कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूटची कायापालट केली आहे. जसे सर्व संस्था चालकांनी आपल्या टायपिंग इन्स्टिट्यूट मध्ये बायोमेट्रिक मशीन बसवणे. सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे. आदी सूचना त्यांना देऊन त्या सूचनेचे पालन देखील करण्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता या टायपिंग इन्स्टिट्यूटच्या संस्था आत्याधुनिक झाल्याचे दिसत आहेत.
महाराष्ट्रातील टायपिंग इन्स्टिट्यूट च्या सर्व संस्था चालकांना चांगली शिस्त लावण्याचे काम करणाऱ्या डॉ. नंदकुमार बेडसे यांनी संगणकाच्या कोर्समध्ये काही शासनाच्या उपयोजना देखील राबवल्या आहेत. त्याचाही फायदा विद्यार्थ्यांना होत आहे. याशिवाय सर्व संस्थाचालकांच्या पाठीशी असणारे डॉ. नंदकुमार बेडसे हे नवीन वर्षामध्ये आणखीन काहीतरी नवीन कोर्स अमलात आणण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय जीसीसी टीबीसी परीक्षेसाठी एक नवीन सॉफ्टवेअर देखील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी उपलब्ध करून दिला आहे. आणि या सॉफ्टवेअरचा फायदा विद्यार्थ्यांना हमखास होणार आहे. त्यामुळे आता जीसीसी टीबीसी हा कोर्स प्रत्येक विद्यार्थी घेणारच आणि त्याला याचा फायदा शासकीय नोकरी मिळवण्यात नक्कीच होणार आहे. त्यामुळे प्रत्येक संस्था चालकाने आपल्या आपल्या पद्धतीने याची प्रसिद्धी कशी करता येईल याचा प्रयत्न करायला हवा आशाही काही महत्त्वाच्या सूचना ठाणे जिल्हा कार्यकरणीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व संस्थाचालकांना दिल्या. तसेच सर्व संस्था चालकांनी आपला कार्यालयातील विद्यार्थ्यांची इथंभूत माहिती. कार्यालयीन रेकॉर्ड, चांगल्या पद्धतीने ठेवा. येणाऱ्या काळात आणखीन काही कडक सूचनेचे पालन देखील आपल्याला करावे लागणार आहेत असाही कानमंत्र सर्व संस्थाचालकांना देण्यात आला. उल्हासनगरातील सर्व संस्था चालकाच्या वतीने ठाणे जिल्हा कार्यकारणीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. उल्हासनगर तालुका प्रतिनिधी नरेश पटेल यांनी सर्व उपस्थित मंडळींसाठी नाश्त्याची सोय केली होती. जवळपास अडीच तीन तास चाललेल्या या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा देखील करण्यात आली.





























