उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी ) : समाजसेवक महेंद्र अहिरे ( माही ) यांच्यावतीने उल्हासनगरातील कॅम्प नंबर -४ परिसरातील सुभाष टेकडी येथे नागरिकांसाठी शासकीय दाखले शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचे उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.

आता काही दिवसातच शाळा आणि कॉलेजमध्ये ऍडमिशन प्रक्रिया सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना ऍडमिशन साठी लागणारे शासकीय दाखले जसे उत्पन्नाचा दाखला,रहिवासी दाखला व इतर दाखल्यांची आवश्यकता भासणार आहे. हे दाखले मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना तहसील कार्यालयात अनेक हेलपाटे मारावे लागतात. तरीदेखील वेळेवर दाखले मिळत नाहीत. नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत समाजसेवक महेंद्र अहिरे यांच्यामार्फत शासकीय दाखले शिबिर आयोजित करण्यात आला होता.

या शिबिराला नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. त्यावेळी ज्येष्ठ नागरिकांना दाखले काढून देण्यात आले. या शिबिराच्या वेळी शासकीय दाखल्यासाठी करण्यात आलेल्या प्रक्रिया पूर्ण करून लवकरच नागरिकांना घरपोच दाखले मिळणार आहेत. या शिबिराला नगरसेविका सुरेखा सुरेश सोनवणे, नगरसेवक विकास खरात, सुरेश सोनवणे, भारतीय मानवाधिकार परिषद अध्यक्ष अभिजीत चंदनशिव, समाजसेवक गणेश मोरे तसेच सुनील जाधव यांच्यासह इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते. तहसील कार्यालय अधिकारी ज्योती बिरासदर तसेच विजय लाटे सर यांनी मोलाचे सहकार्य केले.





























