उल्हासनगर दि २१ ( प्रमोद दळवी ): तब्बल पाच दिवसापासून रस्त्याच्या कडेला पावसात भिजत एक बेवारस व्यक्ती जखमी अवस्थेत पडलेला होता. या व्यक्तीला अनेक जणांनी पाहिले होते. पण त्याला उपचारासाठी मदत करावी किंवा दवाखान्यात घेऊन जावे असा विचारही त्यांच्या मनात आला नाही. फक्त बघायची भूमिका त्यांनी निभावली. पण अशा प्रसंगी एका समाजसेवकाने आपल्या सहकारी मित्राच्या मदतीने त्या बेवरस जखमेव अवस्थेत पडलेला इसमाला दवाखान्यात नेऊन त्याच्यावर त्वरित उपचार सुरू करून त्याला रुग्णालयात उपचाराकरता ऍडमिट करून दाखवून दिले की आजही समाजात असे काही समाजसेवक आहेत ते आपले कर्तव्य बजावत असतात. ही समाजकार्याची घटना उल्हासनगरातील कॅम्प नंबर ४ परिसरातील सुभाष टेकडीतील आहे.
साधारण दुपारी एक वाजेच्या सुमाराची वेळ होती. त्यावेळी प्रज्ञा ज्योती मंडळाचे जेष्ठ सदस्य देविदास इंगळे. यांना एक बेवारस व्यक्ती व्हीजीएन ज्वेलर्स समोरील, सुभाष टेकडी येथे निश्चित पडलेला अवस्थेत दिसून आला. त्या इसमाची ही अवस्था पाहून देविदास यांनी त्वरित सुभाष टेकडीतील सर्वांच्याच परिचयाचे आणि रात्री अपरात्री नागरिकांच्या मदतीसाठी धावून जाणारे समाजसेवक महेंद्र अहिरे ( माही ) यांना या घटनेबाबत सांगितले.

मग काय महिंद्र यांच्यातील समाजसेवक सदैव नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर असतोच. आणि त्यांनी त्या बेवरास व्यक्तीच्या ठिकाणी धाव घेतली. त्या व्यक्तीच्या पायाला खोलवर जखमा झालेल्या होत्या. त्यामुळे चिघळलेल्या जखमेवर माशा तसेच किड्यांनी त्याला बेजार करून टाकले होते. त्या जखमेमुळे त्याला वेदनाही होत होत्या. याशिवाय त्याला अशक्तपणाही आला होता. त्याला उठून बसण्याची ही ताकद नव्हती. त्याला तातडीने उपचाराची गरज असल्याचे महेंद्र अहिरे यांना दिसून येतात त्यांनी सर्वप्रथम या बेवारस व्यक्ती बाबत त्या ठिकाणी चौकशी केली. त्यावेळी असं समजले की तो गेल्या पाच दिवसापासून त्या ठिकाणी पडलेला आहे. याबाबत सोसायटीमधील काही रहिवाशांनी आजी-माजी नगरसेवकांनाही फोन द्वारे या घटनेची कल्पना दिली. काही मा. नगरसेवक त्या ठिकाणी येऊन त्या बेवारस इसमाला बघून देखील गेले. परंतु केवळ आश्वासने देऊन निघून गेले असल्याचे रहिवाशांनी महेंद्र यांना सांगितले. त्यावेळी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे रुपेश रासकर हे देखील महेंद्र यांच्या मदतीला धावून आले. त्यानंतर त्या दोघांनी आरोग्य विभागाला तसेच रुग्णवाहिकासाठी कॉल चालू केले. उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक मनोहर बनसोडे यांना देखील महेंद्र यांनी फोन करून रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी सांगितले. पण त्यांनी आता रुग्णवाहिका उपलब्ध नाही आहे असे सांगतात महेंद्र यांनी खाजगी रुग्णवाहिका बोलून त्या जखमी बेवारस व्यक्तीला तात्काळ सरकारी रुग्णालयात नेले. जवळपास रुग्णालयात तीन तास सर्व सरकारी सोपस्कार पूर्ण केल्यावर त्या जखमी व्यक्तीवर उपचार सुरू झाले. महेंद्र यांनी काही औषधे देखील बाहेरून आणून दिली. त्यांच्या या कामात रुपेशने देखील त्या बेवरच व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात ऍडमिट करेपर्यंत महेंद्र यांची साथ दिली. त्यामुळे महेंद्र यांनी रुपेश याचे कौतुक करून त्याच्या देखील समाजकार्याला सलाम केले आहे.

खरंच या दोघांनी या बेवारस स्थितीत पडलेला जखमी व्यक्तीला रुग्णालयात उपचारासाठी ऍडमिट करून एक बहु मोलाचं आणि समाजकार्याचे काम करून आजही माणुसकी जिवंत आहे हे सर्वांना दाखवून दिले आहे. याबाबत महेंद्र यांनी सांगितले मी काही मोठं काम केले नाही. परंतु जे केले त्यामुळे त्या व्यक्तीला चांगले आरोग्य लाभेल. त्याला जीवदान मिळाले. हीच माझ्या कामाची पोचपावती आहे आणि त्यामुळे मला मानसिक आनंद देखील झाला आहे. आपल्या या समाजकार्यात देविदास इंगळे सर, विलास निकम सर ,पंडित ताजने यांनी देखील वेळीच सहकार्य केल्याने त्यांचे देखील आभार प्रकट केले आहे. महेंद्र अहिरे ( माही ) हे उल्हासनगर वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष असून त्यांनी केलेले या समाज कार्याची उल्हासनगरातील सुभाष टेकडी परिसरात सर्वत्र चर्चा होत आहे.






























