उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी ) : मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचा राग मनात धरून सात जणांच्या टोळीने बेकायदेशीर जमाव जमवून एका महिलेससह तिच्या कुटुंबीयांवर जीव घेणे हल्ला करून त्यांना जखमी करत महिलेचे केस कापून तिची धिंड काढल्याची संताप जनक घटना उल्हासनगरातील मध्यवर्ती पोलीस ठाण्यात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे
पोलीस सूत्राने दिले माहितीनुसार उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर -२ येथील विठ्ठलवाडी परिसरात श्रीमती कांता राजपूत (५० ) ही महिला राहते. यांचे वाघरी कुटुंबाशी आपसात वाद असल्याने या वादातून भांडण झाले होते. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचा राग मनात धरून सकाळी दहाच्या सुमारास उल्हासनगरतील कॅम्प नंबर -३ येथील विठ्ठलवाडी परिसरातील हडकमाता चौक जवळील सार्वजनिक रस्त्यावरील गल्लीत नितीन या तरुणाने बेकायदेशीर जमाव जमवून श्रीमती कांता राजपूत त्यांची बहीण गीता राजपूत व अंजली यांना रस्त्यात अडवून त्यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने जबरी मारहाण केली. तसेच इतर जणांनी त्या महिलांच्या तोंडावर व पाठीवर लाथा बुक्क्याने मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले.
याशिवाय ज्युली व विणू यांनी श्रीमती कांता यांच्या डोक्याचे केस कापून त्यांची धिंड काढली. याप्रकरणी श्रीमती कांता राजपूत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात ज्युली,विणू , पप्पी,नितीन, रोहित, सोनू व महेश वाघरी व इतर जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांना अटक केली असून इतरांचा शोध पोलीस घेत आहेत. महिलांना अमानुषपणे मारहाण करून त्यांचे केस कापून धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सांगितले यांच्यात आपापसात वाद असल्यामुळे भांडण झाले होते. दोन्ही लोकांवर आम्ही कारवाई करत आहोत. याशिवाय त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात येणार आहे. याआधी पोलीस ठाण्यात ३२४ चा गुन्हा दाखल आहे. या घटने संदर्भात गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किर्वे करीत आहेत.





























