मुंबई, दि. ३० : प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्न करत असते. त्यानुसार इवे ट्रान्स प्रा. लि. कंपनीकडून ५१५० ईलेक्ट्रीक बसेस भाडेतत्त्वावर घेण्याबाबत करार करण्यात आला. प्रवाशांना या बसेसच्या माध्यमातून सुविधा मिळण्यासाठी नवीन वेळापत्रकानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला ई- बसेसचा पुरवठा करावा, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

मंत्रालयात आयोजित बैठकीत परिवहन मंत्री सरनाईक बस पुरवठ्याबाबत आढावा घेताना बोलत होते. बैठकीस अपर मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, कंपनीचे के. व्ही प्रदीप आदी उपस्थित होते. बस पुरवठादार कंपनीने दिलेल्या वेळापत्रकानुसार बस पुरवठा करणे अपेक्षित असल्याचे सूचित करीत मंत्री सरनाईक म्हणाले, कंपनीने दिलेल्या बसेसचा चालनीय तोटा लक्षात घेता, राज्य शासनाकडून निधी मिळण्यासाठी व्यवहार्यता अंतर अर्थपुरवठ्यासाठी (viability gap funding) चा प्रस्ताव पाठविण्यात यावा. कंपनीने आतापर्यंत २२० बसेसचा पुरवठा केला आहे. उर्वरित पुरवठा सुधारित करारानुसार करण्यासाठी कंपनीने नियोजन करावे.
बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मंत्री सरनाईक म्हणाले, भाडेतत्वावर कंपनीने ५१५० ईलेक्ट्रीक बसेस पुरवठा करण्याचा करार आहे. त्यापैकी २२० बसेसचा पुरवठा करण्यात आला आहे. यामध्ये १२ मीटर व ९ मीटर लांबीच्या बसेस आहेत. महामंडळाने विभागनिहाय नवीन खाते तयार करून इलेक्ट्रीक बसच्या उत्पन्नामधून कंपनीला बिलांची रक्कम देण्यात येत आहे. त्यानुसार ६० कोटी रूपये कंपनीला देण्यात आले आहे. उर्वरित ४० कोटी रक्कम देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महामंडळाला १२ मीटर बस चालविताना प्रति किलोमीटर १२ रूपये आणि ९ मीटर बस चालविताना १६ रूपये प्रति किलोमीटर तोटा ग्राह्य धरून पुढील काही वर्षात ३१९१ कोटी रूपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली.





























