उल्हासनगर, दि. २३ ( प्रमोद दळवी ) : दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला उल्हासनगर शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. पक्षाचे स्थानिक पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरून व्यापाऱ्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करत होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

सकाळपासूनच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते शहरातील विविध भागांत फिरून दिल्लीतील घटनेचा निषेध व्यक्त करत होते. पक्षाचे नेते सोनू पवार, मनोज पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधत शांततेत बंद पाळण्याचे आवाहन केले. व्यापारी शहर म्हणून ओळख असलेल्या उल्हासनगरातील अनेक व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवत आंदोलनाला साथ दिली,

बंददरम्यान शहरातील वातावरण शांततापूर्ण राहावे यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता. प्रमुख चौक, बाजारपेठा आणि संवेदनशील ठिकाणी पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले होते. पोलिसांच्या दक्षतेमुळे दिवसभरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही आणि आंदोलन शांततेत पार पडले. दुपारी सुमारे ४ वाजल्यानंतर व्यापाऱ्यांनी हळूहळू आपली दुकाने पुन्हा सुरू केली आणि शहरातील व्यवहार पूर्ववत झाले. बंदच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरू असल्याचेही पाहायला मिळाले.आंदोलनादरम्यान मनोज पवार आणि सोनू पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांची भेट घेऊन शहर बंदबाबतचे अधिकृत निवेदन सादर केले. तसेच शांततेत बंद यशस्वी पार पडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या व्यापारी संघटना, रिक्षा संघटना, पोलीस प्रशासन आणि स्थानिक नागरिकांचे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.





























